राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
‘शक्तिपीठ की सक्तीपीठ’ या ‘लोकसत्ता’च्या वृत्तमालिकेतून शक्तिपीठ महामार्गाविषयी अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात आले. या महामार्गात सर्वाधिक भूसंपादन कोल्हापूर व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या महामार्गास कडाडून विरोध केला. तरीही राज्य सरकारकडून दोन्ही जिल्ह्यांतील राज्यकर्त्यांवर दबाव टाकून महामार्ग रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते.
सध्या शक्तिपीठ महामार्गात जी तीर्थक्षेत्रे दाखविण्यात आली आहेत ती रत्नागिरी- नागपूर या अस्तित्वात असलेल्या महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहेत. शक्तिपीठच्या नावे ५० हजार कोटींचा भ्रष्टाचार सुरू आहे. या अट्टहासामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह कराड शहराचे न भरून येणारे नुकसान होणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील शेती, साखर कारखानदारी व उद्याोगांवर याचा दूरगामी परिणाम होईल. मुळात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ५२० हून अधिक गावांना महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. कृष्णा व पंचगंगा, वारणा व दुधगंगा या नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतील. काही ठिकाणी पाण्यास एक मीटरचा उतार मिळणार आहे. याउलट डोंगरातून पाणी वेगात येणार आहे. यामुळे पात्राला फुगवटा येऊन एरवी २५ ते ३० दिवस नदीपात्राबाहेर २ ते ३ किलोमीटर पसरणारे पाणी ३५ ते ४० दिवस रेंगाळेल. सांगली जिल्ह्यातील कर्नाळ फाटा ते कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळ तिठ्यापर्यंत ७० किलोमीटरपैकी जवळपास २२ किलोमीटरपेक्षा जास्त भराव होणार आहे. या भरावाचा कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा व वेदगंगा या नद्यांमधील पाणी निचऱ्यात अडथळा येईल. परिणामी पूरस्थितीत पाणी तीन ते चार किलोमीटर पात्राबाहेर पसरेल. शक्तिपीठ महामार्गाचा भराव व अलमट्टीची वाढलेली उंची या दोन्ही गोष्टींमुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळे येतील. जवळपास अडीच लाख एकर शेतजमीन नापीक होईल. येथील अर्थकारण साखर व दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे हे व्यवसाय तसेच औद्याोगिक अर्थकारण धोक्यात येईल.
कोल्हापूरमधून गोवा व कोकणात जाण्यासाठी सध्या बेळगाव, आंबोली, फोंडाघाट, वैभववाडी, अणुस्करा व आंबा घाट असे पर्याय आहेत. या सर्व मार्गांवरील रस्त्यांचे हजारो कोटी रुपये खर्चून रुंदीकरण करण्यात आले आहे. आता तेथील वाहतूक सुरळीत आणि तुरळक आहे. अशा स्थितीत सह्याद्रीच्या पर्वतरांगातील पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रातून हा महामार्ग बांधण्याचे उद्दिष्ट काय?