– सी.उदय भास्कर

सारी समरगीते, सैनिकांवरल्या साऱ्याच कविता न थांबता पुढे-पुढे जाणाऱ्या सैनिकाचे गुणगान करतात. पण पुढे म्हणजे कुठल्या दिशेला जायचे हे ठरवावेच लागते आणि त्यासाठी जरा मागे वळूनही पाहावे लागते. ही दिशा ठरवण्याचे काम धोरणकर्त्यांचे असते. आजघडीला असे मागे वळून पाहिल्यास दिसेल ते २०२२ पासून सुरूच असलेले युक्रेनमधील युद्ध आणि २०२३ च्या ऑक्टोबरपासून गेले १०० दिवस सुरू असलेला इस्रायल- पॅलेस्टाइन संघर्ष. या रणभूमींशी भारतीय संरक्षण दलांचा थेट संबंध नाही, पण आणखीही काही मुद्दे विचारात घेतल्यास धोरणकर्त्यांपुढे असलेल्या आव्हानांचा नकाशाच स्पष्ट होईल.

Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती

सुरुवात २०२२ पासून करू. रशियाने फेब्रुवारी २०२२ पासून केलेली चढाई आणि तिला युक्रेन देत असलेले प्रत्युत्तर पाहिल्यास एक निष्कर्ष नक्की निघतो की, ‘शीतयुद्ध-काळाच्या समाप्तीनंतर कोणतेही मोठे देश लढाई-चढाईच्या फंदात पडणार नाहीत, भूभागावरून तर नाहीच नाही’ असा जो काही विश्वास होता तो धुळीला मिळाला आहे. हेलसिंकी करार (१९७६) सर्वांनी मान्य केल्यामुळे युरोप खंडातल्या देशांच्या सीमा तरी अनाघ्रातच राहणार असल्याची जी समजूत झाली, ती जर्मनीच्या १९८९ मधल्या एकीकरणानंतर बळकट झाली होती, पण तिलाही फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरुंग लागला.

हेही वाचा…राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने शिक्षक प्राध्यापकांचे काम कमी होईल की वाढेल?

‘नाटो’ संघटना पूर्व युरोपातल्या देशांना कवेत घेत असल्यामागे अमेरिकेची फूसच असल्याचा आरोप पराकोटीला नेऊन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आक्रमणाचे समर्थन करताहेत आणि येत्या महिन्याभरात या युक्रेनयुद्धाला दोन वर्षे पूर्ण होत असली तरी तिसऱ्या वर्षीही ते चालूच राहील अशी चिन्हे आहेत. म्हणजे रशियासारखा अण्वस्त्रसज्ज देश, सलग महिनोनमहिने कुठल्याशा भूभागाच्या वादापायी पारंपरिक शस्त्रास्त्रांनिशी लढत राहातो आहे… त्या देशाने सहनशक्तीची परिसीमा वगैरे युक्तिवाद वापरले तर अण्वस्त्रसज्जतेचीही चुणूक दिसेल का हा प्रश्न अनुत्तरित आहे.

भारताच्या संदर्भात हे महत्त्वाचे अशासाठी की, १९९३ मध्ये झालेला शांतता करार धुडकावून चीनने २०२० मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात घुसखोरी केली. तेव्हापासून आजतागायत दोन्ही देशांनी संयम पाळलेला असला तरी, बीजिंगमधून २०२४ मध्ये कुरापतीचा विचार केला जाणारच नाही याची काही खात्री नाही.

आता २०२३ च्या धड्यांकडे पाहू. सात ऑक्टोबरला हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याला इस्रायलकडून निर्दय पत्युत्तर मिळते आहे. यावर काही तोडगा निघण्याची शक्यता अद्यापही दिसत नाही. पॅलेस्टाइनची समस्या ही फार आधीपासून आहेच. या समस्येचे इस्रायली वसाहतखोरी, दमन आणि वंशभेद असे पदरही वेळोवेळी उघड झालेले आहेत. पण या समस्येची उकल केवळ सशस्त्र हल्ल्याने होऊ शकत नाही. हे विसरून हमाससारख्या राष्ट्रबाह्य (जरी त्यांना कथित पॅलेस्टाइन सरकार आणि इराणचा पाठिंबा असला तरी राष्ट्रबह्यच) संघटनेने हल्ल्याचा माथेफिरूपणा केला. या माथेफिरू बॉम्बहल्ल्याची आणि त्याच वेळी इस्रायलींना ओलीस ठेवण्याच्या प्रकाराची तीव्रता जबर होतीच पण संपूर्णत: गोपनीयता पाळून, इस्रायलसारख्या तगडी गुप्तचर यंत्रणा बाळगणाऱ्या देशाला ठार बेसावध गाठून हमासने हे घडवले. त्यासाठी हमासने वापरलेली रॉकेटही नव्या पद्धतीची होती.

हेही वाचा…रुजवायला हवी, शासकीय त्यागाची संस्कृती

हमास-हल्ल्याला प्रत्युत्तर देणे सुरू असताना डिसेंबरपासून येमेनमधले हूथी बंडखोर कार्यरत झाले. हेसुद्धा राष्ट्रबाह्य शक्ती म्हणावेत असे लोक. पॅलेस्टिनींवर इस्रायलने चालवलेल्या जुलमाचा निषेध म्हणून या हूथींनी, इस्रायलशी दूरान्वयानेच संबंध असलेल्या व्यापारी जहाजांवर हल्ले आरंभलेले आहेत. लाल समुद्रातील या हल्ल्यांचा परिणाम जागतिक -व्यापारावर होऊ लागला, तेव्हा अमेरिकेला समविचारी देशांचे ‘नौदल कृती पथक’ स्थापन करण्याची खटपट करावी लागली. पण नौदलांच्या या पथकातले देश नक्की ‘समविचारी’ आहेत का? ब्रिटन, इटली, फ्रान्स, स्पेन, ग्रीस तसेच इतर देशांचा या पथकात समावेश आहे- यापैकी कैक देशांनी इस्रायलने मानवी हक्कांचा विचार करावा अशा मागणीचे ठराव अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आणले होते. त्यामुळे अमेरिकेला लाल समुद्रातील या पथकाची जबाबदारी मर्यादितच असल्याचे भान सतत पाळावे लागणार आहे.

इथेही ‘तगडी यंत्रणा बाळगणाऱ्यांना एखाद्या राष्ट्रबाह्य शक्तीने ठार बेसावध गाठणे’ हे सूत्र दिसून येते. त्या हूथींकडे धड नौदल म्हणावे असे काही नाही. ड्रोनसारखे तुलनेने स्वस्त तंत्रज्ञान वापरून त्यांनी व्यापारी जहाजांवर स्फोटके डागली. हूथींनी याआधी क्षेपणास्त्रेही वापरली होती, हे लक्षात घेता त्यांना कुणाचा (इराणचा) कसा छुपा पाठिंबा आहे आणि शस्त्रास्त्रांची तस्करी कशी होते या मुद्द्यांपेक्षा आत्ता आणि यापुढे हूथींचे हल्ले कोणत्या थराला जाणार हा प्रश्न अधिक तातडीचा ठरतो. भारतालादेखील ही तातडी जाणवावी, अशी परिस्थिती २३ डिसेंबरला उघड झाली. अरबी समुद्रात, भारताच्या किनाऱ्यापासून २०० सागरी मैलांच्या अंतरावर ‘एमव्ही केम प्लूटो’ या जहाजावर हल्ला झाला. यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली होती.

युक्रेन, इस्रायल आणि व्यापारी जहाजे… या सर्वांवरील हल्ले बेसावध गाठूनच झालेले आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या मर्यादा तर यातून उघड होतातच पण व्यूहात्मक ताणसुद्धा यातून लक्षात यावा. हल्ले होऊ शकतात, होत राहू शकतात, याची शक्यता कितपत गृहीत धरायची, कुठेकुठे सज्जता ठेवायची आणि त्यासाठी उपलब्ध संसाधनांचाच खुबीने वापर कसा करायचा, हे यापुढे ठरवावे लागणार आहे. त्यासाठी कुठकुठले तंत्रज्ञान कोणाकोणाच्या हातांत पोहोचले आहे वा असू शकते, यावरही नजर ठेवावी लागणार आहे.

हेही वाचा…आजीने दाखवलेला राम गेला कुठे?

भारत यासंदर्भात उत्तमच कामगिरी करेल, असे म्हणणे धाडसाचे अशासाठी की आपला बेसावधपणाचा इतिहास केवळ ऑक्टोबर १९६२ मधील चिनी आक्रमणापुरता नसून कारगिल (१९९९), मुंबई हल्ला (२००८) आणि गलवान (२०२०) इतका तो ताजा आहे. या प्रत्येक वेळी ‘मंत्रिमंडळाच्या संरक्षण समिती’सह सर्वच उच्चपदस्थ आधी बुचकळ्यात पडले होते, अशाही नोंदी शोधल्यास सापडतील.

अर्थात हे मान्य केले पाहिजे की, भारतापुढे खरोखरच अनेक संरक्षण-आव्हाने आहेत. ही आव्हाने जशी परक्या देशांकडून आहेत तशीच ती अंतर्गत सुरक्षेला असलेल्या धोक्यांचीही (ज्याला इंग्रजीत ‘लो इन्टेन्सिटी कॉन्फ्लिक्ट- इंटर्नल सिक्युरिटी’ – एलआयसी-आयएस म्हटले जाते, तशी) आहेत. चीन आणि पाकिस्तान या दोघांची हातमिळवणी कितपत त्रासदायक ठरणार याचा धोका आहेच, शिवाय त्या देशांनी पोसलेल्या ‘राष्ट्रबाह्य शक्ती’ ही दिल्लीसाठी डोकेदुखी आहे. हमास, हूथी यांचे जे काही सुरू आहे त्याचा वापर भारतविरोधी प्रचारासाठी आपल्या उपखंडातले काही गट करू शकतात, ही शक्यता आहे तसेच जम्मू भागात (काश्मीर खोऱ्याबाहेर) दहशतवादी कारवाया वाढताहेत हेही धोकादायक ठरणारे आहे. म्यानमारमधील अलीकडच्या घडामोडी आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यांत त्यांचे पडसाद किंवा मालदीवच्या राजकारणाचे चीन समर्थक वळण, हे प्रकार भारतीय हितसंबंधांना प्रतिकूल आहेत. त्याचवेळी, पाकिस्तानातील निवडणुकीमुळे सुप्त भारतविरोध उफाळून येऊ शकतो.

वर्षाच्या सुरुवातीच्या पाच महिन्यांत आपल्याकडेही निवडणूक होणार असल्याने भारताच्या एकूण सुरक्षेबद्दल, आपल्या संरक्षणसज्जतेबद्दल वक्तृत्व तर भरपूरच होत राहील . पण ते वास्तविकतेपासून दूरचे असू शकते. आधुनिकीकरणाच्या अत्यंत आवश्यक प्रक्रियेत उलट निवडणुकीमुळेच निधीची कमतरता यंदा भासू शकते. यापूर्वी मार्च २०१८ मध्ये खंडुरी अहवाल संसदेत मांडण्यात आला होता आणि त्यात भारताच्या लष्करी सज्जतेच्या स्थितीचा आढावा घेण्यात आलेला होता. पण २०१९ च्या निवडणुकीनंतर असा कोणताही वस्तुनिष्ठ आढावा घेण्यात आलेला नाही. भारतीय सैन्याच्या क्षमतेबद्दल होणारी भाषणबाजी आणि आत्ताची सज्जता यांत फरक असण्याच्या शंकेला त्यामुळे वाव उरतो.

हेही वाचा…नरेंद्र मोदींचे नवे ख्रिश्चनप्रेम

त्यापेक्षा अधिक गंभीर आव्हान हे आहे की संस्थात्मकदृष्ट्या, भारतीय संरक्षणदले अगदी वरिष्ठ आणि सर्वात तळाच्या भरती-पातळीला होत असलेल्या मूलगामी बदलांच्या प्रक्रियेतून सध्या वाटचाल करत आहेत. ‘थिएटर कमांड’ मुळे रणभूमी-निहाय वरिष्ठ नियुक्त होतील. अननुभवी तरुणांच्या भरतीची पद्धतही आपण बदलतो आहोत. सेवानिवृत्त थ्री-स्टार अधिकाऱ्याची द्वितीय सीडीएस म्हणून नियुक्ती करणे हा नरेंद्र मोदी सरकारचा एक धडाडीचा निर्णय म्हणून कौतुक झालेले आहेच, परंतु सशस्त्र दलांच्या राजकारणबाह्य स्वरूपाला त्यामुळे खीळ बसली आहे. लष्कराच्या लढाऊ कार्यक्षमतेवर आणि उच्च संरक्षण व्यवस्थापनावर त्याचा परिणाम होईल का, झाल्यास कसा होईल, हे या टप्प्यावर तरी अनिश्चित आहे. तरुणांच्या भरतीसाठी अग्निवीर योजना हा धोरणात्मक बदलही अधिक महत्त्वाचा ठरला आहे. शिवाय, माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या आत्मचरित्रवजा पुस्तकातील काही उतारे इतरत्र छापले गेल्यानंतर वादच नको म्हणून या पुस्तकाबद्दल कसा मनाईहुकूम काढण्यात आला हे आपण पाहिले, तसेच गोरखा रेजिमेंट्सवर झालेल्या परिणामामुळे दीर्घकाळात सैन्याची लढाऊ पातळी कमी होऊ शकते याचीही चर्चा अनेकांनी केली.

‘या झाल्या होऊन गेलेल्या गोष्टी… आपण पुढे पाहायचे… आता पुढेच चालायचे…’ हे ऐकायला छान वाटेल… अगदी युक्तिवाद म्हणूनही हे ग्राह्य मानू. पण मग आपण पुढे तरी पाहातो आहोत काय, हा प्रश्न महत्त्वाचा ठरेल- कारण तो प्रश्न सर्वच पारंपरिक शस्त्रसामग्रीच्या – म्हणजे रणगाडे, युद्धविमाने, विमानवाहू नौका यांच्या- आधुनिकीकरणापर्यंत, आणि पुढे तर ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या वाढत्या वापरापर्यंत जाईल.

तेव्हा पुढचे पाहावे लागणार आहेच, पण मागच्या अनुभवांतून काही धडे घेतलेले बरे… विशेषत: ‘राष्ट्रबाह्य शक्ती’ आणि त्यांच्या हातातले तंत्रज्ञान, त्यांचे छुपे पाठीराखे, यांच्याशीही यापुढे लढावे लागणार आहे हा धडा तर ताज्या इतिहासाने दिलेला आहे.

(लेखक नवी दिल्ली येथील ‘सोसायटी फॉर पॉलिसी स्टडीज’चे संचालक आहेत.)