धर्म ही मानवी संस्कृतीतील एक महत्त्वाची संस्था आहे. प्रत्येक धर्माच्या पायामध्ये काही नैतिक, आध्यात्मिक व सामाजिक मूल्ये असतात, जे मानवाचे जीवन मार्गदर्शित करतात. परंतु, प्रत्येक धर्माच्या काही ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मर्यादा असतात. त्या मर्यादांच्या ओघात धर्म अनेकदा काळानुरूप बदलण्यास नकार देतो, आणि म्हणूनच धर्मसुधारणेची गरज भासते. हिंदू धर्मात राजाराम मोहन रॉय, विवेकानंद, फुले, आंबेडकर अशा विचारवंतांनी धर्मसुधारणा घडवून आणली. ख्रिस्ती धर्मात देखील मार्टिन ल्यूथरपासून सुरू झालेली धर्म सुधारणेची चळवळ प्रसिद्ध आहे. परंतु मुस्लिम धर्मात मात्र व्यापक स्वरूपात धर्मसुधारणेच्या चळवळी फारशा रुजताना दिसत नाहीत. यामागील कारणे अनेक आणि गुंतागुंतीची आहेत.

मुस्लिम धर्माची संकल्पना म्हणजे इस्लाम. इस्लाममध्ये ‘कुराण’ हा पवित्र ग्रंथ, ‘हदीस’ ही पैगंबर महंमद यांच्या आयुष्यातील कृती-उपदेशांची नोंद, आणि ‘शरिया’ हे इस्लामिक कायद्यांचे संहिताक्रम या त्रिकुटाचा मोठा प्रभाव आहे. मुस्लिम धर्मीयांची एक धारणा आहे की कुराण हा अल्लाचा अंतिम शब्द आहे, आणि त्यात बदल करणे हे अल्लाच्या इच्छेविरुद्ध जाणे ठरते. त्यामुळे धर्मग्रंथावर टीका करणे किंवा त्याचे पुनर्मूल्यांकन करणे हेच बहुतेक मुस्लिम समाजात अपवित्र आणि निषिद्ध मानले जाते. यामुळे धर्मसुधारणा सुरू करणे किंवा त्यावर खुलेपणाने विचार करणे अशक्यप्राय होते.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे धार्मिक नेतृत्व सुसंस्कृत विवेकनिष्ठ भूमिका न घेता, कट्टरता आणि रूढीवादाला चालना देणारी भूमिका घेत आले आहे. मुस्लिम धर्मात ‘उलेमा’ किंवा मौलवी वर्गाचे मोठे वर्चस्व आणि प्रस्थ आहे. हे धार्मिक नेते बहुतांशी पारंपरिक शाळांमध्ये शिकून आलेले असतात, जिथे विज्ञान, तर्कशुद्धता किंवा आधुनिक विचारसरणीला फारसा वाव नसतो. त्यांच्या शिक्षणपद्धतीत मूलभूत विचारसरणीचा अभाव असतो, त्यामुळे ते बदलांबाबत अत्यंत सावध (defensive) असतात. धर्म सुधारणेमुळे त्यांच्या वर्चस्वाला बाधा येण्याची त्यांना भीती वाटते. म्हणून एकदा का धर्मसुधारणेचा प्रस्ताव आला, की ते लगेच त्याला ‘धर्मविरोधी’ ठरवतात. अशा परिस्थितीत प्रबोधनवादी विचारवंतांना आवाज उठवणे तर दूरच, पण आपले अस्तित्व टिकवणेही कठीण होते.

तिसरे कारण म्हणजे इस्लाम धर्माचे राजकीय आणि सामाजिक स्वरूप अनेक ठिकाणी एकमेकांशी गुंफलेले आहे. इस्लाम हा केवळ धर्म नसून, एक व्यापक जीवनपद्धती आणि सामाजिक व्यवस्था आहे. त्यामुळे जर तुम्ही धार्मिक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा परिणाम समाजाच्या इतर अनेक पैलूंवर होतो. उदा. महिलांचे अधिकार, कायदाशास्त्र, शिक्षणप्रणाली, वर्तननियम इत्यादी. परिणामी, कोणतीही सुधारणा ही केवळ धार्मिक न राहता ती सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांनाही धक्का पोचवते. यामुळे अनेक मुस्लिमबहुल देशांमध्ये धर्मसुधारणेला प्रत्यक्षात राजकीय विरोध होतो. उदाहरणार्थ, सौदी अरेबियात वा इराणमध्ये शरिया कायद्याला हात लावणे म्हणजे सरकारच्या अधिकृत मतप्रवाहाच्या विरोधात जाणे ठरते. आधुनिक युरोपीय राष्ट्रांनी दिलेल्या धार्मिक-राजकीय धक्क्यांमुळे अनेक मुस्लिमांना वाटते की, आपल्याला धर्मातूनच आपल्या अस्मितेचे रक्षण करावे लागेल. यामुळे धर्म सुधारण्याची चळवळ ही त्यांना स्वधर्माशी गद्दारी केल्यासारखी वाटते. मुस्लिमांमध्ये बऱ्याच वेळा धर्म आणि अस्मिता हे एकरूप होतात. परिणामी, धर्मविषयक सुधारणेचा कोणताही प्रयत्न ‘आपल्या समाजावरील हल्ला’ म्हणून पाहिला जातो.

त्याशिवाय मुस्लीम समाजातील सुधारकांना पुरेशी सामाजिक साथही मिळत नाही. फारच कमी लोक असे असतात जे धार्मिक रूढींच्या विरुद्ध उभे राहतात. या सुधारकांना अनेकदा बहिष्कृत केलं जातं, त्यांच्यावर ‘काफिर’ किंवा ‘मुर्तद’ (धर्मत्यागी) असा शिक्का मारला जातो. काही वेळा तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. भारतात हमीद दलवाई यांचे कार्य हे याचे उत्तम उदाहरण ठरते. त्यांनी मुस्लिम समाजात सुधारणा घडवण्यासाठी पुरोगामी चळवळ सुरू केली, परंतु त्यांना स्वतःच्याच समाजाने फारसा पाठिंबा दिला नाही. उलट मोठ्या प्रमाणात धार्मिक विरोधच झाला. यामुळे अशा प्रयत्नांचे आयुष्य फार काळ टिकत नाही.

मुस्लिम धर्मसुधारणा न रुजण्याचे आणखी एक कारण म्हणजे जागतिक इस्लामी एकात्मतेची (ummah) संकल्पना. मुस्लिम जगतातील अनेक लोक हे स्वतःला केवळ एका राष्ट्राचे नागरिक न मानता ‘इस्लामिक राष्ट्रसमुदाया’चा भाग मानतात. त्यामुळे कुठल्याही स्थानिक सुधारणा त्या तिथल्या समाजापुरत्या मर्यादित न राहता सर्व मुस्लिम जगतात ‘भयावह परिणाम’ घडवू शकतात अशी भीती व्यक्त केली जाते. म्हणून कोणताही स्थानिक सुधारक – मग तो बांगलादेशातला असो वा ट्युनिशियातला – त्याचे विचार संपूर्ण मुस्लिम समाजाच्या चौकटीत तपासले जातात. ही एक अडथळ्याची शृंखला बनते.

हे सर्व असूनही, काही मुस्लिम राष्ट्रांमध्ये किंवा व्यक्तिगत पातळीवर सुधारणा घडवण्याचे प्रयत्न झाले आहेत. टर्कीतील मुस्तफा कमाल पाशा अतातुर्क यांनी धर्म आणि राज्य यांचे विभाजन करून धर्मसुधारणेचा प्रयत्न केला होता. ट्युनिशियामध्ये महिलांना मतदानाचा हक्क, घटस्फोटाचे अधिकार इत्यादी प्राप्त झाले. इंडोनेशिया आणि मलेशिया यांसारख्या देशांत काही आधुनिक विचारसरणीचे मुसलमान धर्माच्या नव्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न करतात. पण ही उदाहरणे अपवादस्वरूप आहेत. संपूर्ण इस्लामिक जगतात व्यापक स्वरूपाची धर्मसुधारणेची चळवळ दिसत नाही.

तसेच अजूनही मुस्लिम धर्म हा कुराण आणि अल्लाबद्दल एकच एक कल्पना करून त्याचा शब्द हा अंतिम प्रमाण मानणारा झाल्यामुळे त्याची अवस्था साचलेल्या पाण्यासारखी झालेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. म्हणूनच काळाशी सुसंगत नसलेल्या देवधर्मविषयक अनेक अंधश्रद्धा मुस्लिम समाज आजही हृदयाशी घट्ट कवटाळून बसला आहे. खरेतर इस्लामच्या प्रारंभीच्या काळात, विशेषतः सातव्या ते तेराव्या शतकाच्या दरम्यान, मुस्लिम जगताने ज्ञान, विज्ञान, गणित, वैद्यक, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत आश्चर्यकारक प्रगती केली. बगदादमधील ‘Bayt al-Hikma’ (ज्ञानालय), अल-ख्वारिज्मीचे गणितातील कार्य, इब्न सीना (Avicenna) यांचे वैद्यकशास्त्रातील योगदान, इब्न रश्द (Averroes) यांचे तत्त्वज्ञान, आणि इब्न हैथमचे (Alhazen) प्रकाशशास्त्रातील संशोधन – ही सर्व उदाहरणे इस्लामी सुवर्णयुगातील बौद्धिक संपत्तीची साक्ष देतात. या मुस्लिम सुवर्णयुगाची अखेर ही मंगोल आक्रमणांमुळे व विविध आंतरराष्ट्रीय युद्धांमुळे झाली. १२५८ मध्ये बगदादवरील मंगोल आक्रमणामुळे ज्ञानाचे प्रचंड नुकसान झाले. त्या काळातील बहुसंख्य शास्त्रज्ञ धर्मनिष्ठतेपेक्षा विवेकावर आधारित विचार करत होते, धर्म आणि विज्ञान या दोघांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कालांतराने, इस्लामिक साम्राज्यांमध्ये रूढीवाद वाढला आणि धार्मिक नेतृत्वाने विज्ञानाकडे संशयाने पाहायला सुरुवात केली. शास्त्रीय विचारांना ‘धर्मभ्रष्ट’ किंवा ‘गैरइस्लामी’ म्हणून हिणवले गेले. परिणामी, धर्माने विवेकावर बंदी आणल्यासारखी स्थिती निर्माण झाली. याच काळात शैक्षणिक संस्थांची अधोगती झाली. मुस्लिम जगतामध्ये मदरसे (धार्मिक शिक्षण संस्था) हे केवळ कुराण आणि हदीस यांच्याच अभ्यासापुरते मर्यादित राहिले. गणित, तर्कशास्त्र, खगोलशास्त्र, तत्वज्ञान या विषयांना कमी महत्त्व दिलं गेलं. परिणामी, शिक्षणाचा उद्देश धार्मिक व्यक्ती घडवणे इतकाच मर्यादित राहिला. हे शिक्षण समाजाच्या व्यावहारिक गरजांशी विसंगत होत गेलं.

जेव्हा युरोपमध्ये रेनेसाँ, वैज्ञानिक क्रांती आणि प्रबोधनकाळ सुरू झाला, तेव्हा मुस्लिम जगत मात्र तिथल्या औपनिवेशिक सत्तांमुळे आर्थिक, राजकीय आणि मानसिक गुलामगिरीत अडकला. अनेक मुस्लिम राष्ट्रांनी आधुनिक शिक्षणपद्धतीकडे संशयाने पाहिलं. हे शिक्षण ‘पश्चिमीकरण’ किंवा ‘धर्मभ्रष्ट’ ठरेल असा विचार करत त्यांनी ते टाळलं. परिणामी, एक मोठा वर्ग पारंपरिक शिक्षणातच अडकून राहिला. धर्म आणि शिक्षण यांचं आजही अनेक मुस्लिम देशांमध्ये अतूट नातं आहे. म्हणजेच धर्म हा केवळ एक श्रद्धेचा विषय न राहता, संपूर्ण समाजरचनेत शिरलेला असतो. अनेक वेळा शालेय अभ्यासक्रमांमध्ये विज्ञान, तर्कशुद्ध विचार, इतिहास यांना फारसा वाव नसतो किंवा ते धार्मिक चौकटीतून शिकवले जातात. मुलांना प्रश्न विचारण्याची, संकल्पना तपासण्याची सवय लावली जात नाही, उलट ‘म्हटले आहे तेच खरे’ अशी शिकवण दिली जाते. त्यामुळे जिज्ञासा, वैज्ञानिक वृत्ती, आणि नवकल्पना यांचा विकास खुंटतो. त्याचबरोबर अनेक मुस्लिमबहुल देशांमध्ये युद्ध, दहशतवाद, लष्करी हुकुमशाही किंवा आर्थिक दुर्बलता ही संकटं सातत्याने राहिलेली आहेत. अफगाणिस्तान, इराक, सीरिया, पॅलेस्टाईन इत्यादी देशांमध्ये शिक्षणव्यवस्था युद्धामुळे उद्ध्वस्त झाली आहे. अशा वातावरणात शिक्षणाला आणि विशेषतः उच्च शिक्षणाला प्राधान्य देणे फार कठीण ठरते. गरीब देशांमध्ये मुलांना लवकर नोकरी लावण्यासाठी प्राथमिक शिक्षणावर भर दिला जातो, पण संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रांतील गुंतवणूक अत्यल्प असते.

त्याशिवाय, महिलांचे शिक्षण हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. अनेक ठिकाणी मुलींना शाळेत जाण्याचा अधिकार मिळत नाही, किंवा मिळाल्यास फार प्राथमिक पातळीपर्यंतच. कोणताही समाज जेव्हा आपल्या अर्ध्या लोकसंख्येला शिक्षणापासून वंचित ठेवतो, तेव्हा तो ज्ञानाच्या शर्यतीत मागेच राहतो. काही प्रगतशील मुस्लिम देशांनी यामध्ये प्रगती केली असली, तरी ती संपूर्ण जगासाठी प्रतिनिधिक ठरू शकत नाही.

तुलनेने ख्रिश्चन धर्मात सुमारे ४०० वर्षापासून आणि हिंदू धर्मात २०० वर्षापासून धर्म सुधारणावादी चळवळी कार्यरत झाल्यामुळे आज त्या धर्मांमध्ये काही बदल झालेला दिसतो. म्हणूनच या दोन्ही समाजातून अनेक अनिष्ट चालीरूढी, अंधश्रद्धा नष्ट झालेल्या आपल्याला दिसतात. त्या उलट मुसलमान धर्मामध्ये जो काही बदल झालाय तो फक्त आणि फक्त परिस्थितीच्या रेट्यामुळेच, मनापासून नाही. त्यामुळे बहुतांशी मुस्लिम समाज अजूनही अशिक्षित असून अंधश्रद्धा आणि अनिष्ठ चालीरुढी जोपासत आहे. म्हणून २१व्या शतकातही मुसलमानांमध्ये धर्मचिकित्सा निशिद्ध मानली जाते. ईशनिंदा करणाऱ्यांना ‘धड तन से जुदा’ करण्याच्या नुसत्याच धमक्या दिल्या जात नाहीत तर प्रत्यक्षात तसे अमानुष कृत्य केले जाते. जोपर्यंत मुस्लिम समाजात खुल्या दिलाने अल्लाची आणि धर्माची चिकित्सा होत नाही तोपर्यंत त्या समाजात धर्मसुधारणा होणे कठीण! याची शिक्षित मुसलमानांना जाण येणे आवश्यक आहे. कारण शिक्षित माणसालाच आपला धर्म जास्त चांगला माहीत असल्यामुळे तो आपापल्या धर्मातील चांगल्या आणि वाईट गोष्टींची चिकित्सा करू शकतो. म्हणूनच काळाबरोबर राहण्यासाठी आणि जगण्यासाठी ख्रिश्चन आणि हिंदूंमध्ये जसे मोठ्या प्रमाणात धर्मसुधारणावादी निर्माण झाले तसेच धर्मसुधारणावादी मुस्लिम समाजातही निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

निष्कर्ष असा की, मुस्लिम धर्मात धर्मसुधारणेची चळवळ रुजत नाही याची अनेक कारणे आहेत – धार्मिक ग्रंथांना अंतिम आणि बदल न करता येण्याजोगी समजणे, कट्टर धार्मिक नेतृत्वाचे वर्चस्व, धर्म व राजकारण यांचे अतूट नाते, ऐतिहासिक अस्मितेची भावना, स्त्रीया या फक्त वंश सातत्यासाठीच असतात हा गैरसमज. त्यामुळे त्यांना शिक्षणाची गरज नाही हा त्यांच्यात असलेला समज, सुधारकांना मिळणारी मर्यादित साथ आणि इस्लामी एकात्मतेमुळे स्थानिक प्रयत्नांनाही विरोध, अशा अनेक बाबींचा त्यात समावेश आहे. तथापि, काळाच्या ओघात व जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे तरुण पिढीमध्ये प्रश्न विचारण्याची आणि नव्या अर्थाने धर्म समजून घेण्याची इच्छा वाढू लागली आहे. ही बदलाची नांदी ठरू शकते. धर्मसुधारणा ही एकदाच होणारी घटना नसून ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. इस्लाममधील प्रबोधन हळूहळू का होईना, पण विचारशील पातळीवर सुरू आहे. हे प्रवाह किती प्रभावी होतील, हे येणाऱ्या पिढ्यांच्या विवेक, साहस आणि बौद्धिक आत्मसन्मानावर अवलंबून असेल. आज जर मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा जगाच्या ज्ञानयात्रेत महत्त्वपूर्ण स्थान मिळवायचं असेल, तर शिक्षणात मूलभूत सुधारणा, विज्ञानावर आधारित विचार, स्त्रियांचा समान सहभाग आणि धर्माच्या खोल अर्थाची नव्याने चिकित्सा करण्याच्या गोष्टी आवश्यक आहेत. इस्लामचा मूळ आत्मा ‘इक़रा’ – म्हणजे ‘वाचा’, ‘शिका’ – या शब्दाने व्यक्त होतो, आणि म्हणूनच शिक्षण हाच नवप्रगतीकडे जाण्याचा खरा मार्ग आहे. हे त्यांना जेवढे लवकर कळेल तो सुदिन!

jetjagdish@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.