जगभरातील सर्व मानवी संस्कृतींचा जन्म नद्यांच्या काठी झाला, ही एकच गोष्ट नद्यांचे मानवी इतिहासातील महत्त्व सांगण्यास पुरेशी आहे. आज मात्र संस्कृतीच्या या जननी मानवी हव्यासाच्या शिकार बनल्या आहेत. भारतातील अनेक नद्या आज मरणगतीला लागल्या आहेत. गंगा, पंचगंगा म्हणून ज्यांना पुजले जाते, त्यांच्याही गटारगंगा झाल्या आहेत. आधुनिकीकरण आणि विकासाच्या घाईत त्यांच्या अवस्थेबद्दल दोन अश्रू ढाळण्याइतका वेळही कोणाकडे नाही. पाणी म्हणजे जीवन असे ज्या संस्कृतीत मानले जाते, तेथील ही अनास्था खास तिसऱ्या जगाची देणगी म्हणावे, तर अमेरिकेसारख्या अतिविकसित देशातील परिस्थितीही फार काही वेगळी नाही. गेल्या आठवडय़ातील वेस्ट व्हर्जिनिया राज्यामधील नदीप्रदूषणाची भीषण घटना अमेरिकेतील जलप्रदूषणाने किती ‘नीचतम’ पातळी गाठली आहे याचीच निदर्शक आहे. या राज्यातून एल्कनदी वाहते. या नदीतून राज्यातील सुमारे तीन लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या नदीकाठच्या चार्लस्टन नामक गावात फ्रीडम इंडस्ट्रीजचा एक प्लँट आहे. या कंपनीने कोळसा धुण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या ४-मेथाईलसायक्लोहेक्झेन मिथॅनॉलचा मोठा साठा करून ठेवला होता. गेल्या गुरुवारी त्या रसायनाची गळती झाली. पाणी शुद्धीकरण केंद्रातच ते शिरले. हा भीषण अपघात होता. राज्यातल्या नऊ जिल्ह्य़ांतील नागरिकांचे आरोग्यच यामुळे धोक्यात आले. मात्र विकसित आणि अविकसित जगातील खरा फरक अशा वेळी दिसून येतो. हा अपघात घडल्याचे समजताच तातडीने यंत्रणा कामास लागली. या सर्व भागांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या जिवावरचे संकट टळले. तरीही दोनेकशे जणांना रसायनबाधा झालीच. यानंतर नदीची विषबाधा उतरवण्याचे प्रयत्न तातडीने सुरू झाले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ताबडतोब राज्यात आणीबाणी घोषित केली. टँकरने पाणी उपलब्ध करून देण्यात आले. आपल्याकडील भोपाळ वायुकांडाशी या घटनेची तुलना करता येणार नाही. युनियन कार्बाइड या अमेरिकी कंपनीतून गळती झालेल्या त्या विषारी वायूने बहुसंख्य लोकांना झोपेतच घेरले होते. परंतु त्यानंतर मदतकार्याबद्दल जी अनास्था आपल्याकडे दिसून आली ती मात्र अतुलनीय होती. या पाश्र्वभूमीवर अमेरिकी यंत्रणांची तत्परता वाखाणण्याजोगी आहे. मात्र त्याचबरोबर याच यंत्रणांच्या नाकर्तेपणामुळे हा अपघात घडला हेही विसरता येणार नाही. कोणत्याही नदीच्या काठी एवढय़ा घातक रसायनाचा साठा करून देण्यास परवानगी देणे हाच मुळी गुन्हा होता. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार कंपनीने वर्षभरापूर्वीच त्याची कल्पना वेस्ट व्हर्जिनियातील संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती. तरीही त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या राज्याची उद्योगांबाबतची नीती. वेस्ट व्हर्जिनियातील कानव्हा व्हॅलीचे दुसरे नावच मुळी केमिकल व्हॅली असे आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर येथे रासायनिक आणि कोळसा उद्योग आहेत. राज्याची अर्थव्यवस्था त्यांच्यावर चालत आहे. त्यामुळे या उद्योगांना कोण दुखावणार? त्यामुळेच उद्योगाच्या प्रदूषणाबद्दल कठोर आणि परिणामकारक कायदे न करण्याकडे राज्याचा कल राहिला. त्याची झळ आता ते सोसत आहेत आणि विशेष म्हणजे अशा अपघातांची ही तेथील पहिली वेळही नाही. पण तरीही प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच होत राहिले. बडय़ा कंपन्या आणि त्यांचे व्यवस्थेतील साथीदार यांच्या अशा गुन्हेगारी कृत्यांच्या विरोधात लढणाऱ्या एरिन ब्रोकोविचने आता वेस्ट व्हर्जिनियाचा प्रश्न हाती घेतला आहे. सगळी अमेरिकाच या अपघाताने खडबडून जागी झाली आहे. पण इतिहास हेच सांगतो, की ही जाग काही खरी नसते. लोक लवकरच सगळे विसरतात आणि झोपतात.