अभिनेत्री रेखा, गायिका आशा भोसले, संगीतकार खय्याम आणि अगदी शायर शहरयार यांचीसुद्धा आठवण ‘उमराव जान’ या चित्रपटाचा उल्लेख होताच दर्दीना होते. या चित्रपटाचे निर्माते- दिग्दर्शक मुजफ्फर अली यांचे नाव मात्र अभावानेच घेतले जाते. उमराव जानच्या गाण्यांना चित्रपटीय पुरस्कार जरूर मिळाले, पण तेथेही दिग्दर्शकाचे नाव मागेच राहिले. पद्मश्री (२००५) हा एकमेव पुरस्कार आजवर गाठीशी असणाऱ्या या मुजफ्फर अलींना यंदाचा ‘राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ २० ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे. यापूर्वी मदर तेरेसा, लता मंगेशकर, दिलीप कुमार अशा थोरांना दिला जाणारा हा पुरस्कार आता मुजफ्फर यांना मिळणार आहे. चित्रकार, फॅशन डिझायनर, कवी, चित्रपटकार आणि लघुपटकार अशी बहुपेडी ओळख असलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान सुमारे दशकभराने होतो आहे.
अवधच्या राजघराण्याशी संबंध असलेल्या कोटवारा संस्थानाधिपतींच्या घराण्यात मुजफ्फर यांचा जन्म झाला. वडील राजा सय्यद साजिद हुसेन हे विलायतेत शिकलेले, उदारमतवादी आणि तरक्कीपसंद. मुजफ्फर मात्र संस्थानी काळाचे लाभार्थी ठरू शकले नाहीत. ते अलिगढ आणि लखनऊ येथे शिकले. अर्थात, त्या वेळी ‘महाभारत’कार राही मासूम रझा, शहरयार, कलिमुद्दीन आझमी अशा शायरांचा सहवास मुजफ्फरना लाभला आणि मूळच्या गंगाजमनी परंपरेचे वारसदार असलेले मुजफ्फर, सूफी पंथाचे अभ्यासक बनले. महाविद्यालयात भूगोल, वनस्पतीशास्त्र असे विषय घेतलेले असले तरी बालपणापासून जोपासलेला चित्रकलेचा छंद शाबूत असल्याने, विसाव्या वर्षी मुजफ्फर यांनी कोलकात्यातील जाहिरात संस्थेत कारकीर्द सुरू केली. तेथून दिल्लीला, पर्यटन विभागासाठी जाहिरातपट बनविण्याचे काम केले आणि मग ‘एअर इंडिया’च्या प्रसिद्धी विभागात दहा वर्षे नोकरीही केली. हे करत असताना १९७२ मध्ये मुंबईतील चोखंदळ अशा ‘पंडोल आर्ट गॅलरी’ने मुजफ्फर अलींचे चित्रप्रदर्शन भरवले होते.
नोकरी सोडून पूर्णवेळ कलाक्षेत्रात उतरण्याची ऊर्मी याच सुमारास जागी झाली. मुजफ्फर यांनी आधी लघुपटनिर्मितीत, पुढे पूर्ण लांबीच्या कथा-चित्रपट निर्मितीत पाऊल टाकले. मात्र ‘बॉलीवूड’मध्ये आपल्याला कधी मोठे व्हायचे नाही, होता येणार नाही आणि होऊही नये हे त्यांनी ठरवलेले होते.  हिंदी सिनेमांचा प्रेक्षकवर्ग खेडोपाडी पसरलेला असला तरी हा सिनेमा प्रामुख्याने मध्यमवर्गीयच आहे आणि खरोखरचे ‘भारतीय विषय’ त्यात कमी येतात, हे त्यांचे मत आजही कायम आहे. आपला इतिहास मांडण्यास आपण कमी पडतो, असे ते म्हणतात, तेव्हा वस्तूकरण झालेला नायकांचा इतिहास अर्थातच त्यांना अभिप्रेत नसतो.