अर्थहीन राजकीय निष्ठांची नौटंकी पुरे!
भाडेवाढ कमी केल्यामुळे मुंबई आणि उपनगरात स्थानिक ते राज्य पातळीवरच्या भाजप नेत्यांचे आभार मानणारे फलक जागोजागी झळकले. क्षणभर मनात आले केंद्रात कुणाचे सरकार आहे.. भाजपचे की काँग्रेसचेच? अवचित शोलेमधील गब्बरचे वाक्य आठवले ‘गब्बर की ज्यादतियोसे आप को एक ही आदमी बचा सकता है.. खुद गब्बर’ तद्वत आम्हीच केलेल्या भाडेवाढीपासून तुम्हाला दिलासा देणारे कुणी असेल तर ते आम्हीच!
जनतेला संभ्रमित करणारा हा पक्ष विरुद्ध सरकार असा हा लुटूपुटूचा खेळ कशासाठी? आणि मग विरोधी बाकांवरून केवळ तत्कालीन राजकीय फायद्यासाठी विरोधाला विरोध करण्याचे राजकारण का करता ? राजकीय पक्षांचे कार्यकत्रे अर्थहीन राजकीय निष्ठेपायी विवेकाला सोडचिठ्ठी दिल्यागत का वागतात? केवळ राजकीय विरोधकांविषयीच का बोलतात? सरसकट इतर पक्षांच्या सर्व धोरणांना विरोध का करतात? आपली बांधीलकी जनतेच्या प्रश्नाशी आहे असे मानून सर्व प्रकारच्या अन्यायाला विरोध का करीत नाहीत?
खरे तर खूप ऊर्जा असलेला परंतु पक्ष-चाकोरीच्या मर्यादेत अडकलेला हा वर्ग प्राधान्याने स्वत:ला, समाजाला उत्तरदायी समजू लागला तर राजकीय क्षेत्रातील वैचारिक गल्लत/गफलत/गहजब कमी होऊन आक्रसलेली व्यवस्था सुधारण्यास ते उपकारक ठरेल.
सबब सर्व राजकीय पक्षांना मन:पूर्वक एकच विनंती : अशा नौटंकीत वेळ वाया घालवून भारतीय लोकशाहीला प्रगल्भ करण्याची आणि आनुषंगिक व्यवस्थेला सुधारण्याची, वेगळे आयाम प्रदान करण्याची संधी दवडू नका. गरज असल्यास सरकार म्हणून विरोधक, माध्यमे, जनता साऱ्यांना विश्वासात घेऊन टप्प्याटप्प्याने कठोर निर्णय जरूर राबवा. पण हा असा उलटा घास घेऊन आम्हाला उल्लू बनवू नका.
सत्यवान पाटील
वलयाविनाच फरफट..
‘हा कंडू शमवाच’ या शीर्षकाचा अग्रलेख (७ जुलै) समयोचित आहे. मोदी लाटेमुळेच शिवसेनेला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ झाला आहे, तरीही यावेळी भाजपला सेनेपेक्षा महाराष्ट्रात चार जागा जास्त मिळाल्या आहेत हे महत्वाचे मुद्दे शिवसेनेने लक्षात घेऊन भाजपला निम्म्या जागा द्याव्यात आणि फारतर ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री ही तडजोड स्वीकारावी अन्यथा शिवसेनेचा कंड शमवण्यासाठी भाजपने कंबर कसून तयारी करावी यातच महाराष्ट्राचे आणि भाजपचे हित आहे. बाळासाहेब ठाकरे असताना भाजपची फरफट होत होतीच, त्या पाठीमागे बाळासाहेबांचे वलय तरी होते .त्या तुलनेत उद्धव यांचे वलय अद्याप आकाराला आले नाही हेही लक्षात घ्यावे.
श्रीनिवास जोशी, डोंबिवली- पूर्व
तोटय़ात जाणेच रेल्वेस पसंत
मुंबई उपनगरी रेल्वे सेवा चालविण्यास येत असलेला खर्च हा उत्पन्नाच्या जवळपास दुप्पट असल्याने ही सेवा तोटय़ात जात आहे असे सांगितले जाते. शिवाय त्या एकूण खर्चाच्या (२,८०० कोटी रुपये ) ३० टक्के रक्कम देखभाल-दुरुस्तीवर खर्च होते असेही सांगण्यात येते. यार्डात उभ्या केलेल्या गाडय़ांत केवळ चोऱ्या व तोडफोड होते असे नाही. किंबहुना तेथे उभ्या असलेल्या गाडय़ा रेल्वे कर्मचारी हेतुपूर्वक नादुरुस्त करून देखभालीच्या वाढत्या खर्चाला हातभार लावत असतात, हा प्रकार रेल्वे प्रशासनानेच उघडकीला आणला आहे. टपाल खात्यात काम करणाऱ्यास मोफत टपाल तिकिटे दिली जात नाहीत, ‘आरे’सारख्या दुग्धव्यवसाय संस्थेत काम करणाऱ्यांना मोफत दूध घरी नेता येत नाही, मग रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासासाठी मोफत पास देऊन रेल्वे तोटय़ात जाणे का पसंत करते, ते कळत नाही.
श्रीराम गुलगुंद, चारकोप (मुंबई)
‘वाद निर्मितीतून राजकारण’ हेच सूत्र?
हरियाणातील भाजप नेते ओमप्रकाश धनखड यांनी हरियाणाच्या मुलांची लग्ने बिहारच्या मुलींशी सत्ता दिल्यास लावून देऊ असे वक्तव्य केल्याचे समजले. किती मूर्खपणाचे लक्षण म्हणावे. हरियाणाचे स्त्री-पुरुष संख्येचे हरयाणामधील गुणोत्तर देशात सर्वात कमी आहे, हे सर्व जण जाणतात. अशा परिस्थितित सत्ता आल्यास जनजागृती करून िलगगुणोत्तर सुधारण्याचे प्रयत्न करणे अपेक्षित असताना ही अशी वक्तव्ये करणे म्हणजे निर्लज्जपणाचे लक्षण आहे. वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध ‘डिग्गीं’वर टीकेची झोड उठवणाऱ्या, अन्य पक्षीयांना लोकशाहीचे धडे देणाऱ्या भाजपचे नेतेही बेताल बडबडीनेच अधिक प्रसिद्धी मिळवू लागले, तर कठीण आहे. अशाने, ‘समाजकारणातून राजकारण’ हे जुने तत्त्व सत्ता मिळविण्याच्या शर्यतीत पूर्णपणे मागे पडून ‘वाद निर्मितीतून राजकारण’ हेच सूत्र झाले की काय, अशी शंका वाढेल. राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करून हे प्रकार थांबवून विकासाभिमुख होण्याची गरज आहे. भाजप नेत्यांनी आत्ता कुठे मिळालेल्या सत्तेने हुरळून जाण्याची गरज नाही, कारण असल्याचे नसते होण्यास वेळ लागत नाही.
अक्षय नलावडे, परांडा (उस्मानाबाद)
डॉक्टर-चिठ्ठीच्या पडताळणीचा उपाय
‘कट प्रॅक्टिसवर शस्त्रक्रिया’ हे वृत्त (लोकसत्ता, ५ जुलै) वाचले. इंडियन मेडिकल असोसिएशनने औषधकंपन्या, औषध विक्रेते आणि रोगनिदान प्रयोगशाळांकडून मिळणाऱ्या कमिशनला चटावलेल्या डॉक्टरांची कमिशनखोरी बंद करण्यासाठी या खरातीवर बंदी आणण्याच्या दृष्टीने नवीन नियमांद्वारे जो पायबंद घातला, ते योग्यच झाले. कमिशनच्या नादात रुग्णांशी खेळणाऱ्या संबंधित कसाईवृत्तीच्या डॉक्टरांना यामुळे तरी चाप लागेल. एम.डी., स्पेशालिस्ट डॉक्टरांचे सोडाच पण गल्लीछाप डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनही गच्च भरलेले असते. मग आजार कितीही साधारण का असेना. याचे इंगित काय, हे ज्ञातच आहे.
या कसाईवृत्तीच्या डॉक्टरांचा खरोखरच बंदोबस्त करायचा असेल, तर आणखी एक उपाय योजला पाहिजे. ज्या कुठल्या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर किंवा त्यांनी लिहून दिलेल्या चाचण्यांच्या आवश्यकतेवर रुग्णास शंका असेल, त्याची व संबंधित रुग्णाची पडताळणी थेट शासकीय वैद्यकीय यंत्रणेमार्फतच केली जावी, म्हणजे तपासणी- उपचार- औषधे व त्यांची मात्रा हे सारे आवश्यक होते की कट प्रॅक्टिससाठीच हा प्रपंच केला गेला, हे आपसूक स्पष्ट होईल. मग सर्वच डॉक्टरांच्या इमानदारीवर वा सेवावृत्तीवर शंका घेण्याचे कारणही राहणार नाही!
रविशंकर शुक्ला, मालेगाव (जि. नाशिक)
स्वबळावर लढा, नाहीतर विलीन व्हा!
निवडणुकी पुरते युती/ आघाडी करणारे पक्ष नंतर मात्र इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भावनांची फिकीर नकरता, त्या पक्षाच्या मोठय़ा नेत्यावर लागट भाषेत मुखपत्रातून टीका करतात. इतकेच काय युती धर्माचा टेंभा मिरवणारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनाकलनीय तडजोडी करून सत्ता अक्षरश उपभोगतात. काही मतदार संघ मक्तेदारी पद्धतीने एकाच पक्षाकडे वर्षांनुवष्रे ताब्यात रहातात, तेथील पक्ष कार्यकर्त्यांची घुसमट होत असते.
राजकीय पक्षांतील घडामोडींचे वार्ताकन सर्व माध्यमांतून पुढे येत असल्यामुळे आता कार्यकत्रेच नव्हे तर जनताही या तुमच्या तथाकथित देशसेवेच्या अभंगवाणीला वैतागली आहे. उद्देश एकच असेल तर विलीन व्हा अन्यथा स्वबळावर लढा.
मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)
‘उपशाखाप्रमुख’ हे चूक
मुरुड येथे समुद्रात मुंबईचे सहाजण बुडाल्याच्या बातमीत (लोकसत्ता, ७ जुलै) ‘उपशाखाप्रमुख’ हा शब्दप्रयोग खटकला वास्तविक हा उल्लेख ‘शाखा उप-प्रमुख’ असा व्हायला हवा. कारण ‘शाखा’ ही ‘उप’ नसून, प्रमुख हे पद ‘उप’ आहे.
हर्षवर्धन दातार, ठाणे</p>
..हेही निर्थकच!
‘खेळ खिलाफतीचा की तेलाचा’ ही नौशाद उस्मान यांनी ‘खिलाफत खेळ’ या ३० जूनच्या अग्रलेखावर दिलेली प्रतिक्रिया (लोकमानस, ५ जुलै) वाचली. पण याच अग्रलेखातील ‘ताजा बाटलेला ज्याप्रमाणे अधिक उंच बांग देतो’ हे शब्द नौशाद यांच्या नजरेतून कसे काय सुटले? त्याही वाक्याला काही अर्थ नसून एका धर्माबद्दलच्या विशिष्ट कल्पनांतून असे लिहिले जात असावे, असे मानायला जागा आहे.
सय्यद मारुफ महेमूद, नांदेड</p>