गणपतीच्या आधी राज्यावर सावट होते ते पुन्हा एकदा येऊ घातलेल्या दुष्काळाचे! गेली सलग दोन वर्षे पाणीटंचाईची गेल्यानंतर पुन्हा या वर्षी पाऊस पाठ फिरवणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. विशेषत: राज्याचा पर्जन्यछायेचा टापू म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, येथेही अशी स्थिती होती. आता आशा होती ती अखेरच्या टप्प्यातील- गणपती आणि नवरात्रीच्या माळेत पडणाऱ्या पावसाची. गेली दोन वर्षे या पावसाने म्हणावी अशी हजेरी लावली नव्हती, पण यंदा या पावसाने हात दिला आणि राज्यातील टंचाईचे चित्रच पालटले. पर्जन्यछायेच्या प्रदेशात या वर्षी जलसंधारणाची चांगली कामे झाली होती. मात्र, ही कामे झाल्यानंतर पाऊसच न पडल्याने तेथील बंधारे, रुंद व खोल केलेले नाले, ओढे कोरडेच होते. गणपतीच्या पहिल्या दिवसापासून या भागात पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि जवळजवळ दररोज त्याने चांगली हजेरी लावली. आतापर्यंत पाण्याच्या प्रतीक्षेत असलेले तलाव, बंधारे भरलेच; शिवाय ओढे-नाले, कोरडय़ा पडलेल्या नद्यासुद्धा वाहू लागल्या. हा पाऊस सर्वच दुष्काळी टापूत पडला. सांगली जिल्हय़ातील जत-आटपाडी, साताऱ्यातील माण-खटाव, तसेच पुणे-सोलापूर जिल्हय़ांमधील दुष्काळी पट्टय़ातही तो पडला. मराठवाडय़ातही औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, बीड या जिल्ह्य़ांमध्ये हजेरी लावून त्याने टंचाई दूर केली. एका आठवडय़ात परिस्थिती कशी बदलू शकते, हेच पावसाने या वेळी दाखवून दिले. आतापर्यंत पावसासाठी आसुसलेल्या या भागांत आता अशी परिस्थिती आहे की, पुढील वर्ष-दीड वर्षांची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे तब्बल दोन-तीन वर्षांनंतर यंदाचा रब्बी हंगाम उत्तम जाईल, अशी आशा आहे. याशिवाय या उन्हाळय़ात तरी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवणार नाही, हा दिलासा या पावसाने दिला आहे. दुसरीकडे, विदर्भात आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात या पावसाने तारांबळ उडवली. हाताशी आलेल्या पिकांचे या पावसामुळे नुकसान झाले. विशेषत: ठिकठिकाणचे सोयाबीनचे पीक खराब झाले आहे, बऱ्याच ठिकाणी वाया गेले आहे. इतर पिकांच्या बाबतीत कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. विदर्भात तर या वर्षी पावसामुळे आधीच भयंकर नुकसान झाले होते. त्यात भर म्हणून जातानासुद्धा पावसाने जबरदस्त फटका दिला. या अनुभवावरून राज्यात पावसाची दोन्ही रूपे पाहायला मिळाली. एकीकडे या पावसाने दिलासा दिला, तर दुसरीकडे तो नुकसानीला कारणीभूत ठरला. अजूनही पाऊस थांबलेला नाही. परतीच्या प्रवासातही तो फटका देतोच. त्याचा प्रवास आताशी कुठे राजस्थानपासून सुरू झाला आहे. तो महाराष्ट्रातून निघून जायला अजूनही किमान दोन आठवडे जावे लागतील. गेल्या काही वर्षांचा अनुभव सांगतो की, पावसाळ्यात सुरुवातीपेक्षा अखेरच्या टप्प्यात जास्त प्रमाणात पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे पावसाळा अधिकृतरीत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस संपला, तरी प्रत्यक्षात पाऊस ऑक्टोबपर्यंत रेंगाळतो. यामुळे रब्बीच्या (हिवाळी हंगाम) पिकांसाठी जमिनीत ओल कायम राहणार असली तरी तयार झालेल्या खरिपाच्या (पावसाळी हंगामातील) पिकांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.. या स्थितीवरून हेच स्पष्ट झाले आहे की, पाऊस त्याच्या पद्धतीने पडतो. त्याच्याशी जुळवून घेणे आपल्या हातात असते. तसे केले तर त्याचा फायदा करून घेता येतो, नाही तर नुकसानीला सामोरे जावे लागते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Sep 2013 रोजी प्रकाशित
पावसाचा ‘हात’
गणपतीच्या आधी राज्यावर सावट होते ते पुन्हा एकदा येऊ घातलेल्या दुष्काळाचे! गेली सलग दोन वर्षे पाणीटंचाईची गेल्यानंतर पुन्हा या वर्षी पाऊस पाठ फिरवणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती.

First published on: 24-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain causes