आपल्या जीवनात आपल्याला अपूर्णता वाटत असते आणि त्यामुळेच जीवनाला पूर्णता देणारा असा कोणता तरी हेतू असला पाहिजे, असं आपल्याला वाटतं. त्यामुळे जीवनाचा खरा अर्थ काय, जीवनाचा खरा हेतू कोणता, असे प्रश्न आपल्याला पडतात, असं जे. कृष्णमूर्ती यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. आपलं जीवन कसं आहे, हे सांगताना ते म्हणतात की, परस्परसंबंध हेच आपलं जीवन आहे, परस्परसंबंधांतील कृती हेच आपलं जीवन आहे. कृष्णमूर्ती यांच्या सांगण्याचं हे सूत्र ध्यानात घेऊन आपण आपल्या जगण्याकडेही पाहिलं तर हेच दिसेल की आपलं जीवन माणसांनी भरलेलं आहे, आपल्या जगण्यावर माणसांचा प्रभाव आहे. मग तो प्रभाव सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल. अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल. अशा माणसांनी भरलेल्या, माणसांना महत्त्व असलेल्या जगण्यात ‘सुखीं संतोषा न यावे, दु:खी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावें मनामाजी’ ही स्थिती आपल्याला प्राप्त करायची आहे! जो संसारात आहे, माणसांमध्ये आहे, पण त्यांच्यात आसक्त नाही, जो अनासक्त भावानं जगत आहे अशा समचित्त व्यक्तीचं वर्णन ‘ज्ञानेश्वरी’त आहे. आता हे वर्णन आपल्याला नुसतं वाचायचं आहे म्हणून बरं! तर माउली सांगतात, ‘‘तरि जो या देहावरी। उदास ऐसिया परी। उखिता जैसा बिढारीं। बैसला आहे।।’’ उखिता म्हणजे पाहुणा. म्हणजे पाहुणा म्हणून जसं आपण कुणाकडे गेलो तर त्या घराविषयी आपल्याला जितपत आस्था असेल तितपतच आस्था स्वत:च्या देहाविषयी या अनासक्ताला असते. आता पाहुणे म्हणून आपण कुणाकडे गेलो आणि त्यांनी आपल्या घरातलं सामानसुमान इकडून तिकडे हलवलं, तरी आपल्याला काही वाटतं का? स्वत:च्या घरात आपल्याला न विचारता एखादं कपाट इकडचं तिकडे हलवू द्या, आपण लगेच ओरडतो, मला न विचारता असं का केलं? तेव्हा देहाविषयीचं ममत्वच न उरल्यानं देहगत ओढींचीच या अनासक्ताला पर्वा नसते. देहाला सुखसोयी आवडतात, देहाला दुसऱ्यांनी केलेली सेवा आणि आदर आवडतो, मान आवडतो. देहाला कष्ट आवडत नाहीत, अवमानजनक वागणूक आवडत नाही. या कशाकडेही त्याचं लक्ष नसतं. ‘‘कां झाडाची साउली। वाटे जातां मीनली। घरावरी तेतुली। आस्था नाहीं।।’’ वाटेनं जाताना झाडाची सावली लागली तरी त्या सावलीसाठी काही कोणी चालणं थांबवत नाही. त्याचप्रमाणे अनासक्ताचं मन भौतिकात अडकून पडत नाही. ‘‘साउली सरिसीच असे। परी असे हें नेणिजे जैसें। स्त्रियेचें तैसें। लोलुप्य नाहीं।।’’ चालताना सावली बरोबरच असते, पण तिची जशी जाणीव नसते, तसं अनासक्ताचं मन स्त्रीमध्ये आसक्त नसतं. आता या ओवीच्या निमित्तानं काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. सावलीची जशी तुम्ही पर्वा करीत नाही, काळजी घेत नाही तशी पत्नीची पर्वा करू नका, काळजी घेऊ नका, असा दृष्टिकोन इथं अभिप्रेत आहे का, स्त्रीला दुय्यम लेखण्याच्या वृत्तीचाच हा प्रत्यय आहे का, असे प्रश्न कुणाच्या मनात येऊ शकतील. त्यांचा थोडा विचार करू.