लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी दरवर्षी सुमारे १३ ते १४ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असतो. या स्पर्धा परीक्षेतील टोकाची स्पर्धा लक्षात घेता यांतील यशापयशाची जोखीम प्रत्येकाने स्वीकारायला हवी. एक मात्र नक्की की, या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करताना जी मानसिक सक्षमता आपल्यात येते ती आपल्या आयुष्याच्या पुढील प्रवासासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरते. या परीक्षेची तयारी करताना देशातील इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारीही आपोआप होत असते. म्हणूनच या परीक्षेची तयारी शिस्तबद्धतेने सुरू करावी.
मित्रांनो, गेले काही दिवस यूपीएससी/ एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, तयारी कशी करावी, या विषयीची माहिती आपण घेतली. आज आपण या परीक्षांच्या शेवटच्या टप्प्याविषयी- मुलाखतीसंबंधीची माहिती करून घेऊयात.
मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणसंख्येत फारसा फरक नसतो. त्यामुळे मुलाखतीतील गुण हे अंतिम यादीत स्थान प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीच्या संदर्भात अनेक गैरसमज आहेत. उदा. मुलाखत देणारी व्यक्ती सुंदर असावी. मुलाखतीला जाताना अमुक एका प्रकारचा वेश परिधान करावा. पॅनलने प्रश्न विचारला की लगेच उत्तरे द्यावीत. शक्यतो उत्तरे सरकारी धोरणांनाच अनुकूल होतील अशी द्यावीत, इत्यादी. या अत्यंत चुकीच्या व भ्रामक कल्पना आहेत. मुलाखतीला सामोरे कसे जावे, हे समजून घेऊयात..