करोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाण्यामध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाउन लागू होणार आहे. यावेळी लॉकडाउन एकचे सगळे नियम आणि निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागू होईल. १ जुलै ते ११ जुलैपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. भाजी तसंच मासळी बाजारदेखील या काळात बंद असतील. मुंबईला ये-जा देखील करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी असणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. याआधी उल्हानसगर आणि भिवंडीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तर नवी मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून यामुळे करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण ठाण्यात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाण्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु होती. प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. पण अखेर आज पोलीस आणि महापालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर लॉकडाउनचा अधिकृत आदेश देण्यात आला आहे. आणखी वाचा- …अन्यथा ठाणेकरांवर कडक कारवाई करणार, पोलिसांचा इशारा पोलिसांचा कारवाईचा इशारा दरम्यान निर्बंध थिथील झाल्याने लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून ठाणे पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. "ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबवली, भिवंडी, उल्हासनगर या चार महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांची वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी घऱात राहणं अपेक्षित आहे. गरजेच्या गोष्टी, कामांसाठी खासगी कार, टॅक्सी, रिक्षा ज्यामध्ये एक अधिक अशा दोघांना आणि दुचाकीवर एकालाच परवानगी आहे. असं असतानाही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. कंटेनमेंट झोन, रेड झोन वाढत आहेत," असं अमित काळे यांनी सांगितलं आहे. "या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी सर्व ठिकाणी कडक नाकाबंदी लावली आहे. विनाकारण फिरणारे, गरज नसताना बाहेर पडणारे यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. गाड्या जप्त देखील केल्या आहेत. कालच्या दिवसात दोन हजार वाहनांवर कारवाई केली. पहाटे पाच वाजेपर्यंत अडीचशे वाहनांवर कारवाई झाली आहे. सर्व नागरिकांनी घरातच थांबावं, अनावश्यक असताना बाहेर पडू नये अथवा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल," असा इशारा अमित काळे यांनी यावेळी दिला आहे.