आधुनिक युगात जगण्यासाठी लागणाऱ्या घटकांचे प्राधान्य कमालीचे बदलले आहे. सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. इंटरनेटच्या जाळ्याने अवघे जग एकमेकांशी जोडले गेले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून समाज माध्यमाच्या माध्यमातून सतत एकमेकांच्या संपर्कात राहणे, एकमेकांची संवाद साधणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याइतकीच आता इंटरनेट सुविधेचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश केला जाऊ लागला आहे. देशातील एक स्मार्ट महापालिका प्रशासन असा लौकिक असलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने काळाची गरज ओळखून शहरात वायफाय सेवा देण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. काही जणांचा या सेवेला विरोध आहे. ‘आधी रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन या सुविधा द्या, त्यानंतर इंटरनेटचा विचार करा’ असेही काहींचे म्हणणे आहे. वायफाय सेवा देणे हे महापालिका प्रशासनाचे काम नाही, असा सूरही आळवला जाऊ लागला आहे. गेली काही वर्षे ठाणे परिसरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात वायफाय सेवा देण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्यापैकी काहींनी त्या सुरूही केल्या. मात्र निवडणुकांचा हंगाम सरताच त्यापैकी बऱ्याच वायफाय सुविधा बंद करण्यात आल्या. ठाणे शहरालाही आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. वर्षभरावर महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे इतर अनेक दिखाऊ योजनांप्रमाणे हेसुद्धा केवळ आश्वासनाचे गाजर नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जाऊ लागली आहे. यानिमित्ताने या संकल्पित ‘वायफाय' सुविधेचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.. ‘वायफाय’ सुरक्षित आहे का? ठाणे महापालिकेने शहरात विनामूल्य ‘वायफाय’ सेवा सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून येत्या सहा महिन्यांत शहर ‘वायफाय’युक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या सुविधेचा गैरवापर होऊ नये म्हणून ठोस उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान ठाणे पोलिसांपुढे असणार आहे. मात्र पोलिसांनी यापूर्वीच शहरामध्ये वायफाय सेवेविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून त्यासाठी ‘ठाणे वायफाय सेप्टी ड्राइव्ह’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत इंटरनेटच्या सुयोग्य वापराचे ज्ञान आणि वायफाय सुरक्षिततेविषयीची माहिती सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याने ठाणे पोलिसांपुढील भविष्यातील आव्हाने काहीशी कमी होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेची वायफाय सेवा.. ठाणे, कळवा, मुंब्रा शहरांत शेकडो विजेचे खांब उपलब्ध असून त्यापैकी ४०० खांबांवर वायफाय सुविधेसाठी आवश्यक असणारी यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्याचबरोबर संबंधित कंपनीतर्फे ४०० सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेनेही नुकतीच मान्यता दिल्याने ही यंत्रणा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्तावानुसार, मोफत वायफाय सेवेसाठी महापालिकेकडे सुरुवातीला शंभर रुपयांचे नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. या सेवेमध्ये ५१२ केबीपीएसइतका वेग उपलब्ध होऊ शकणार आहे. नेट वापरासाठी हा वेग पुरेसा असला तरी काहींना अधिक वेगवान सुविधा हवी असते. अशांसाठी अतिरिक्त शुल्क आकारून वेगवान सेवा पुरविण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. सध्या विविध दूरसंचार कंपन्यांमार्फत आकारल्या जाणाऱ्या शुल्कापेक्षा हे शुल्क कमी असणार आहे. मात्र ते किती असेल, हे अद्याप पालिकेने स्पष्ट केलेले नाही. ज्या ठिकाणी मोबाइल नेटवर्क उपलब्ध आहे, त्या भागात ही सेवा उपलब्ध होणार आहे. ठाणे शहरातील ‘नेटकरी’ ठाणे शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी इंटरनेट सुरक्षिततेविषयी एक सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १२ ते ७० वयोगटांतील सुमारे अडीचशे नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. त्यामध्ये ६६ टक्के मुले, ७० टक्के तरुण आणि ५७ टक्के वयस्कर दिवसातून चार ते आठ तास इंटरनेटचा वापर करतात, अशा ठळक गोष्टी पुढे आल्या. तसेच ५६ टक्के मुले, ७० टक्के तरुण आणि ५६ टक्के वयस्कर इंटरनेटचा वापर मोफत वायफायद्वारे करतात. त्याचप्रमाणे सर्व वयोगटांतील ६० टक्के लोकांना इंटरनेट वापरणे सुरक्षित नाही असे वाटते, ही बाबही समोर आली. वायफाय सुरक्षित शहराचे उद्दिष्ट इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांपासून सुरक्षित राहायचे असेल तर प्रत्येकाने डिजिटल साक्षर होणे गरजेचे आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर ठाणे पोलीस, अहान फाऊंडेशन व टीम डिजिटल आणि सुरक्षित ठाणे अशा सर्वानी एकत्र येऊन २०१७ पर्यंत ठाणे शहराला राज्यातील पहिले ‘वायफाय सुरक्षित शहर’ करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी या सर्वानी शहरातील सार्वजनिक व घरगुती वायफाय सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वायफाय सुरक्षिततेचा प्रचार वायफाय इंटरनेट सेवा आता विविध ठिकाणी विनामूल्य सुरू करण्यात आली असून त्या सेवेचा अनेक जण फायदा घेतात. मात्र त्या सेवेचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे ‘ठाणे वायफाय सेप्टी ड्राइव्ह’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ठाणे पोलीस, वायफाय इंटरनेट तज्ज्ञांची टीम असलेले वाहन, अहान फाऊंडेशन व टीम डिजिटल आणि सुरक्षित ठाणे या सामाजिक संस्था आदींच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये वायफाय इंटरनेट तज्ज्ञांच्या टीमने आतापर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल, सिनेमागृहे या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील असुरक्षित वायफाय यंत्रणा शोधली आणि त्यांना ही यंत्रणा सुरक्षित कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. बुधवंत यांनी दिली. वायरलेस नेटवर्कसाठी काय काळजी घ्यावी? ’सुरक्षित व प्रामाणित राउटरचा वापर करा. ’नियमितपणे आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम व अॅन्टिवायरस सिस्टिमचा अपडेट घ्या. ’आपल्या वायरलेस राउटरला कठीण पासवर्ड देऊन सुरक्षित करा. ’लॉगिन पासवर्ड दर तीन महिन्यांनी बदला. ’वायफाय नेटवर्कची रेंज सुरक्षित करा आणि राउटर घरच्या मध्यभागी लावा. जेणेकरून त्याचा वापर घराबाहेर होणार नाही. ’घरात किंवा कार्यालयामध्ये प्रत्येक वायफाय वापर करणाऱ्यांसाठी स्वतंत्र पासवर्ड तयार करा. ’कोणत्याही अनोळखी वायफाय नेटवर्कचा वापर करू नका आणि कोणतीही वैयक्तिक व आर्थिक माहिती देऊ नका. ’असुरक्षित वायफाय नेटवर्कचा धोका लक्षात घ्या. ’युनिक असा एसएसआयडी सव्र्हिस सेट आयडेन्टिफायर (नेटवर्कचे नाव) नेटवर्क तयार करा आणि तो प्रसारित करू नका. ’वापर नसताना नेटवर्क बंद ठेवा. ’आपल्याला नेटवर्क सुरक्षित करणे जमत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.