सौर यंत्र, जलसंचयन योजनांच्या तपासणीचा ठाणे आयुक्तांचा निर्णय; स्वतंत्र पथकाची निर्मिती
पर्यावरणपूरक अशी सौर यंत्रणा आणि पर्जन्य जलसंचयाची योजना राबवून महापालिकेच्या मालमत्ता तसेच इतर करांमध्ये घसघशीत सूट घेणाऱ्या गृहसंकुले आणि व्यावसायिक आस्थापनांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
शहरातील काही गृहसंकुलांमध्ये यापूर्वी सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या लहान प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. हे प्रकल्प उभे करताना या संकुलांनी करांमध्ये मोठी सवलत पदरात पाडून घेतली आहे. प्रत्यक्षात ७० टक्क्य़ांहून अधिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रे बंद असल्याचे मध्यंतरी पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या पाश्र्वभूमीवर सौर यंत्रणा आणि पर्जन्य जलसंचयनाच्या प्रकल्पांची नेमकी काय अवस्था आहे, हे महापालिका तपासून पाहणार आहे.
पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीसाठी राज्य सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. केंद्र सरकारनेही सोलार सिटी नामक एक योजना आखली असून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना काही कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी आपल्या हद्दीत उभारली जाणारी गृहसंकुले तसेच व्यावसायिक आस्थापनांसाठी अशाच स्वरूपाच्या योजना आखल्या. त्यानुसार ज्या गृहसंकुलांमध्ये पर्जन्य जलसंचयाचा प्रकल्प राबविला जाईल, तेथील रहिवाशांच्या मालमत्ता करात ३० टक्क्य़ांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने स्वतच्या काही कार्यालयांमध्येही अशाच स्वरूपाच्या प्रकल्पांची उभारणी केली. असे असले तरी गेल्या काही वर्षांत या प्रकल्पांची पुरेशा प्रमाणात निगा राखली जात नसल्याच्या तक्रारी खुद्द पर्यावरणप्रेमींकडून केल्या जात आहेत.

गृहसंकुलांची तपासणी
पर्जन्य जलसंचयाप्रमाणेच संकुलांमध्ये सौर यंत्रणांची उभारणी करून करातील सवलती पदरात पाडून घेणाऱ्या आस्थापनांची संख्याही शहरात बरीच मोठी आहे. विशेषत घोडबंदर मार्गावर अशास्वरूपाचे प्रकल्प उभे केले जात असून त्याद्वारे विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींचा फायदा पदरात पाडून घेणाऱ्या बिल्डरांची संख्याही मोठी आहे. तरी ज्या प्रकल्पांच्या आधारे करसवलती पदरात पाडून घेतल्या जात आहेत ते प्रत्यक्षात सुरू आहेत का? याची तपासणी करण्याचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे. ठाणे शहरातील काही संकुलांमधील मलप्रक्रिया केंद्रांची मध्यंतरी पर्यावरण विभागांमार्फत पाहाणी करण्यात आली. सांडपाण्यावर प्रक्रिया करून संकुलांमधील उद्यानांसाठी तेच पाणी वापरावे यासाठी प्रोत्साहनपर ही योजना सुरू केली होती. प्रत्यक्षात बहुतांश गृहसंकुले आणि खासगी आस्थापनांमधील ही केंद्र बंद किंवा नादुरुस्त अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन सौर यंत्रणा आणि जलसंचय योजनांची अवस्था कशी आहे हे पाहण्यासाठी महापालिका स्वतंत्र पथकाची स्थापना करणार आहे.