कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यातील साहेबांना सांगून अटकेत असलेल्या आरोपीला सोडविण्यासाठी सांगतो, असे सांगून तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच घेणाऱ्या दोन खासगी व्यक्तींनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यामुळे हे दोघे तपासादरम्यान कोणत्या साहेबाचे नाव घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राजकुमार भारती, रामप्रकाश तिवारी अशी अटक केलेल्या खासगी व्यक्तींची नावे आहेत. तक्रारदाराचा भाऊ महात्मा फुले पोलीस ठाण्यात एका गुन्ह्य़ात अटक आहे. या गुन्ह्य़ातून भावाची सुटका करण्याची हमी राजकुमार व रामप्रकाश यांनी घेतली. आपण महात्मा फुले पोलीस ठाण्यातील साहेबांना सांगून आरोपीला सोडविण्यास सांगतो, असे या दोघांनी तक्रारदाराला सांगितले. याप्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या पथकाने दोन लाखांपैकी पन्नास हजार रुपये स्विकारताना दोघांना अटक केली.