कल्याण, डोंबिवली या शहरांसह ठाणे, मुंब्रा, कळवा, मीरा-भाईंदर या शहरांतील भागांना पाणीपुरवठा करणारी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाची (एमआयडीसी) जलवाहिनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. एमआयडीसीची जलवाहिनी फुटण्याची ही गेल्या महिन्याभरातील तिसरी घटना आहे. सध्या सर्वच शहरांत तीव्र पाणीटंचाई असताना अशा प्रकारच्या गळतीमुळे पाणीसंकट अधिक गडद होणार आहे. कल्याण शीळ मार्गावरील काटईनाका ते खिडकाळी मंदिरदरम्यानची ७२ इंची व्यासाची जलवाहिनी सोमवारी रात्री बाराच्या सुमारास फुटली. त्यातून हजारो लिटर पाणी वाया गेले. तसेच काही काळ परिसरातील वाहतुकीलाही अडसर निर्माण झाला. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. ते काम मंगळवारी दुपारी तीनपर्यंत सुरू होते. त्यामुळे या जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सायंकाळनंतर पूर्ववत झाला, अशी माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.