घोडबंदर येथे गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तीन जणांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. महीपालसिंग चुन्डावत (२७), रमेशचंद्र बलाई (२३) आणि प्रमोद गुप्ता (३४) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नाव आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १० लाख रुपये किंमतीचा १०० किलो गांजा जप्त केला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक कारही जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा- कल्याण डोंबिवली पालिकेच्या डॉक्टर दाम्पत्याची ५६ लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घोडबंदर येथील ओवळा भागात काहीजण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट पाचचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी एक कार संशयितरित्या त्याठिकाणी फिरत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने ही कार थांबवून तिची झडती घेतली. त्यावेळी कारमध्ये ८० किलो गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कारमधील महीपालसिंग, रमेशचंद्र आणि प्रमोद या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, आणखी २० किलो गांजा त्यांनी एका बंद पडलेल्या उपाहारगृहात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हा गांजाही जप्त केला. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.