कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दिवसेंदिवस भटक्या श्वानांचे प्रमाण वाढत आहे. या भटक्या श्वानांनी सन २०२४-२०२५ या वर्षभराच्या कालावधीत पालिका हद्दीतील १४ हजार २४८ नागरिकांना दंश केला आहे. मागील दोन वर्षाच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली परिसरातील सुमारे ३६ हजाराहून अधिक नागरिकांना भटक्या श्वानांनी दंश केला आहे. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातून ही माहिती उपलब्ध झाली आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे ८० हजाराहून अधिक भटके श्वान आहेत. या भटक्या श्वानांच्या त्या पिसाळल्याच्या, दंश करत असल्याच्या वाढत्या तक्रारी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडे आल्या की त्या श्वानांना पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण, लसीकरणच्या प्रक्रिया वेळोवेळी पार पाडण्यात येतात.
रात्रीच्या वेळेत कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना ते पायी असताना, रिक्षा, दुचाकीवर असताना भटके श्वान त्यांच्या पाठीमागे लागून त्यांना दंश करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरांच्या काही भागातून रात्रीच्या वेळेत प्रवास करणे भटक्या श्वानांमुळे जोखमीचे झाले आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
श्वान दंश झाल्यानंतर नागरिकांना पालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयांमध्ये, आरोग्य केंद्रांमध्ये श्वान दंश प्रतिबंधित लस उपलब्ध करून देण्यात येते. सन २०२२-२०२३ मध्ये कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरातील १६ हजार ४१४ नागरिकांना श्वान दंश झाला. यामध्ये लहान बालकांचाही सहभाग आहे. २०२३-२०२४ मध्ये २० हजार ३९० नागरिकांना श्वान दंश झाला. श्वान दंश झालेल्या या नागरिकांवर पालिकेच्या रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर रुग्णालयांमध्ये आणि पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये श्वान दंश लस प्रतिबंधक उपचार करण्यात आले, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक कमलेश सोनवणे यांनी दिली.
सन २०२२-२३ मध्ये १४ हजार १०८ श्वानांवर पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रात निर्बिजीकरणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावर्षी ३६० श्वानांना रेबिज झाले होते. २०२३-२४ मध्ये १४ हजार ४१० श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली. यावर्षी ४२० श्वानांना रेबिज झाले होते. २०२४-२५ मध्ये १५ हजार ४४५ श्वानांवर निर्बिजीकरणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावर्षी ३९६ श्वानांना रेबिज झाले होते, असे आरोग्य निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले.
खासगी दवाखान्यांमध्ये श्वान दंश उपचार घेतले तर एका इंजेक्शनसाठी सुमारे सातशे ते आठशे रूपये मोजावे लागतात. श्वान दंश झाल्यावर पालिकेत मोफत उपचार केले जातात. त्यामुळे बहुतांशी नागरिकांचा ओढा पालिकेत असतो, असे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
भटक्या श्वानांवर निर्बिजीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी कल्याणमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ एक केंद्र आहे. येथे उपचाराच्या सर्व सुविधा आहेत. असेच एक केंद्र डोंबिवली एमआयडीसी भागात सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांना श्वान दंश झाल्यावर त्यांच्यावर जखमेप्रमाणे पालिका रुग्णालय, दवाखान्यांमध्ये तातडीने उपचार केले जातात.- कमलेश सोनवणे आरोग्य निरीक्षक.