कल्याण: पत्नी, मुलाची राहत्या घरात हत्या करून फरार झालेल्या दीपक गायकवाड याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी संभाजीनगर येथून अटक केली. गुंतवणुकीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करून आर्थिक विवंचनेत गेल्यामुळे त्याने हा प्रकार केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

जोपर्यंत आरोपी दीपकला आमच्या ताब्यात दिले जात नाही. त्याला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही अश्विनी गायकवाड (२५), आदिराज (७) यांचे मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका अश्विनीच्या नातेवाईकांनी घेतली आहे. रविवारी सकाळपासून सुमारे १५० हून अधिक नागरिक पालिकेच्या कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालयात जमले आहेत. दोन्ही मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा… बेछूट आरोप करण्याआधी तीन प्रश्नांची उत्तरे द्या, आनंद परांजपे यांचे जितेंद्र आव्हाड यांना जाहीर आव्हान

दीपक गायकवाड याने वित्तीय कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून वाढीव व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे जमा केले होते. या माध्यमातून त्याने अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. आमची बहिण अश्विनीला तो माहेरहून पैसे आण म्हणून नेहमी मारझोड करत होता. मुलाला मारून टाकण्याची धमकी देत होता. नातेसंबंध तुटू नयेत म्हणून आम्ही आतापर्यंत १५ लाखाहून अधिक रक्कम दीपकला दिली आहे, अशी माहिती मयत अश्विनीच्या भावाने माध्यमांशी बोलताना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्नी, मुलाची हत्या केल्यानंतर दीपक घरातून बाहेर पडला. चालकाला सोबत घेऊन त्याने भ्रमंती केली. त्याने आम्हाला अश्विनीचा कोठेही शोध घेऊ नका, तिला मी मुलासह मारून टाकले आहे, असा निरोपही दीपकने आम्हाला दिला. मृत्यूपूर्वी अश्विनीने आम्हाला तातडीने भेटण्याचा निरोप दिला होता. तिला भेटण्यासाठी निघालो होतो, प्रवासात असताना तिची हत्या झाल्याचे समजले, अशी माहिती अश्विनीच्या नातेवाईकांनी दिली. पोलिसांनी दीपकला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू केली आहे, असे सांगितले.