नाटय़संमेलनाच्या परिसंवादामध्ये सहभागी निर्मात्यांचा सूर
मराठी नाटय़ व्यवसायाची ‘इंडस्ट्री’ करायची असेल तर सगळ्यात आधी शासनाने नाटकांना उद्योगांचा दर्जा देण्याची गरज आहे. नाटय़ व्यवसायाला अनुदानाच्या कुबडय़ांची गरज नाही तर त्यांना खऱ्या मदतीची गरज आहे. उद्योगाचा दर्जा दिल्याने ती मदत मिळू शकते. नाटय़ व्यवसायाला बँकांमधून कर्ज उपलब्ध होऊ शकेल. शिवाय अनेक व्यावसायिक संस्था नाटय़ व्यवसायात उतरून नाटय़क्षेत्राचा चांगल्या प्रकारे विस्तार करू शकेल, असा सूर अखिल भारतीय नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने आयोजित परिसंवादामध्ये मान्यवरांनी लावला.
अखिल भारतीय नाटय़ संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमातील पहिला परिसंवाद ‘नाटय़ व्यवसायाची ‘इंडस्ट्री’ कशी होणार?’ हा होता. या परिसंवादात निर्मात्या लता नार्वेकर, प्रसाद कांबळी, आनंद म्हसवेकर आणि संपदा जोगळेकर उपस्थित होते. डॉ. उदय निरगुडकर यांनी संवादकाची भूमिका पार पाडली. मराठी नाटय़सृष्टीला एक शिस्तबद्ध व्यावसायिक संस्था बनवण्याच्या दृष्टीने काय केले जाईल याचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी बोलताना प्रसाद कांबळी यांनी मराठी प्रेक्षकांच्या चोखंदळपणाचे कौतुक केले. मराठी प्रेक्षक हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांतील चित्रपटांना गर्दी करत असतो. त्याला जे आवडते त्याचा आस्वाद घेण्यासाठी तो पैसे खर्च करण्यासाठीही तयार असतो. प्रत्यक्ष रंगभूमीवरील सादरीकरण पाहणारा भारतीय भाषांमधील सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग मराठी असल्याचे प्रसाद कांबळे यांनी नमूद केले. तसेच नाटय़क्षेत्राच्या वाढीसाठी शासनाने पुढाकार घेऊन नाटकांचे लेखापरीक्षण करण्याची गरजही त्याने व्यक्त केली. आनंद म्हसवेकर यांनी मराठी रंगभूमीची अवस्था फारशी चांगली नाही. नाटक ही कला प्रेक्षकांशिवाय जगू शकत नाही. शिवाय नाटकांसमोर चित्रपटसृष्टी आणि टीव्ही माध्यमाचे आव्हान आहे. नाटक हा मनोरंजनाचा तिसरा पर्याय आहे. तरीही सध्याचे निर्माते चांगले प्रयोग लोकांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे विचार त्याने मांडले, तर लता नार्वेकर यांनी पूर्वीचे कलाकार हे नाटय़भूमीविषयी एक निष्ठा घेऊन काम करत होते. आजच्या तरुण कलाकारांमध्ये ती ‘लगन’ दिसून येत नाही. कलाकार आपले मूल्य वाढवण्यासाठी बाह्य़गोष्टींचा उपयोग अधिक करत असतात. नाटक करण्यासाठी त्यांच्या अटींची संख्या वाढू लागली आहे. शिवाय अनेक माध्यमांमध्ये असलेली आव्हाने तोडणे कठीण होऊन बसले आहे, असे नार्वेकरांनी सांगितले. आजच्या नाटय़ व्यवसायाविषयी संपदा जोगळेकर यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. नव्या पिढीसमोर नवी आव्हाने असून या नव्या आव्हानांचा उपयोग व्यवसायामध्ये करून घेण्याची आहे.चांगल्या संकल्पना निर्मात्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली.
नव्या नाटकांची घोषणा..
परिसंवादाच्या अखेरच्या सत्रामध्ये प्रत्येक निर्मात्याने त्यांच्या पुढील वर्षांच्या नव्या नाटकांची माहिती व्यासपीठावर दिली. लता नार्वेकर हे गजेंद्र अहिरे लिखित एक नवे नाटक घेऊन येत आहेत. तर ‘लोचा मावशी’ नावाचे एक विनोदी नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे.
आनंद म्हसवेकर ‘यूटर्न’ या त्यांच्या नाटकाचा पुढील भाग ऑक्टोबरमध्ये घेऊन येणार आहेत. प्रशांत कांबळी भद्रकाली प्रोडक्शनच्या जुन्या नाटकांना ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच संपदा जोगळेकर यांचे ‘संगीत ताजमहल’ हे नाटक ८ एप्रिल रोजी दाखल होणार असून ‘किमयागार’ आणि ‘आम्ही दोघी’ ही दोन नाटके पुढील वर्षी देणार आहेत.