अंबरनाथः सुरूवातीला विधान परिषद निवडणूक आणि नंतर शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीमुळे शिवसेनेचे अनेक आमदार आपल्या मतदारसंघापासून २० दिवस दूर होते. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत २० दिवसांपासून होते. सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शन ठराव झाल्यानंतर अखेर आमदार मतदारसंघात परतले. शहरात परतल्यानंतर मंगळवारी त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेत पाणी साचणाऱ्या सखल भागांची पाहणी केली.
विधान परिषद निवडणुकीत मतदान एकसंघ रहावे यासाठी शिवसेनेच्या आमदारांना दोन दिवस आधीच मुंबईतील एका नामांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेतील आमदारांचे बंड समोर आले. या बंडासाठी शिवसेनेचे आमदार सुरूवातील सुरत आणि नंतर गुवाहाटीला तसेच अखेरच्या टप्प्यात गोव्यात आणि पुन्हा मुंबईत वास्तव्यास होते. या २० दिवसांच्या प्रवासात अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकरही सहभागी होती. अखेर सोमवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शन ठराव जिंकल्यानंतर सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात परतले. डॉ. बालाजी किणीकरही नुकतेच आपल्या मतदारसंघात परतले. २० दिवसांनी अंबरनाथमध्ये परतल्यानंतर आमदार डॉ. किणीकर यांनी शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आणि पालिकेचे अभियंते उपस्थित होते.
अंबरनाथ पश्चिमेतील कल्याण बदलापूर राज्यमार्गावर गेल्या तीन दिवसात दोनवेळा पाणी साचल्याने राज्यमार्ग ठप्प पडत होता. याभागाची पाहणी करत ज्या अतिक्रमाणांमुळे नाल्याला अडथळा होतो आहे ते हटवण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे डॉ. किणीकर यांनी सांगितले. तसेच पूर्वेतील बी केबिन परिसरातही अशीच समस्या असून त्यावर तोडगा काढण्यासाठी आराखडा तयार करून निधीसाठी प्रस्ताव देण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिल्याचेही डॉ. किणीकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. २० दिवसांनी डॉ. किणीकर मतदारसंघात परतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यांचे समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. वीस दिवस मतदारसंघात नसलो तरी मतदारसंघाची कामे होत होती, असेही डॉ. किणीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.