लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील पूर्व भागातील दत्तनगरमध्ये मुख्य वर्दळीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला माऊली महिला मंडळ आणि दत्तनगर बाळ मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या काळात उभारलेल्या कमानी अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. या कमानींमुळे या भागात दररोज सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होते.

या कमानींच्या भागात दोन अवजड वाहने समोरासमोर आली तर या भागात अभूतपूर्व वाहन कोंडी होते. या राजकीय कमानी असल्यामुळे पालिकेच्या ग प्रभाग, वाहतूक विभागाला या कमानींवर कारवाई करता येत नसल्याचे समजते. या भागात दत्तनगर चौकातून स्वामी विवेकानंद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे आयरे रस्ता भागात जाणारी सर्व प्रकारची वाहने दत्तनगर भागातून इच्छित स्थळी जातात.

आणखी वाचा-कंत्राटी कामगारांना दिवाळीपुर्वी वेतन द्या- ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे खातेप्रमुखांना आदेश

डोंबिवली पूर्व भागातून मानपाडा रस्त्याने जाणारी वाहने, मानपाडा रस्त्याने पश्चिमेत जाणारी वाहने दत्तनगर भागातून वाहतूक करतात. या वाहतूकीला दत्तनगर भागात दोन टोकाला बसविण्यात आलेल्या दोन कमानींचा अडथळा होत आहे. या कमानी हटविण्याची मागणी नागरिक पालिकेकडे करीत आहेत. परंतु, राजकीय दबावामुळे पालिका अधिकारी या कमानी काढून टाकत नसल्याचे सांगण्यात येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दत्तनगर भागातील मासळी बाजार अन्य भागात हटविण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी पालिकेच्या महासभेत घेण्यात आला आहे. तरीही हा मासळी बाजार पालिकेकडून अन्य भागात हटविला जात नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोर पदाधिकाऱ्यांकडून उभी केली जाणारी वाहने आणि याच भागात लागणाऱ्या वडापावच्या हातगाड्या यामुळे शाखेसमोरील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.