Ganesh utsav 2025 : ठाणे : ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाच्या गणेशोत्सवात ठाणेकरांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशीपर्यंत झालेल्या आकडेवारीतून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जित करण्याचे प्रमाण १९ टक्क्यांनी वाढले आहे तर, खाडीत थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींचे प्रमाण यंदा ३२ टक्क्यांनी कमी झाले आहे. शिवाय, विशेष टाकी व्यवस्था (हौद) यातील विसर्जनाचे प्रमाण यंदा २० टक्के आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील प्रमाण यंदा चार टक्के आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे. काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला होता. त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर, अनंत चतुर्दशीलाही नागरिकांनी सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. कळवा प्रभाग समिती क्षेत्रात नागरिकांनी सुरूवातीला खाडीत विसर्जनाचा आग्रह धरला होता. मात्र, महापालिका आणि पोलीस प्रशासनाने त्यांना विनंती केल्यावर येथील नागरिकांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करून सहकार्य केले. त्यामुळे पारसिक घाटावर कोणीही मूर्ती नेली नाही, असेही मनीषा प्रधान यांनी सांगितले.

१०५१० पैकी ७३९२ मूर्ती शाडू मातीच्या

गौरी आणि गणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १७९३९ मूर्तींचे विसर्जन झाले. त्यात, १६९४४ गणेश मूर्ती तर, ९९५ गौरी मूर्ती होत्या. त्यात, १२७ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचाही समावेश होता. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे आणि गौरी मूर्तींचे विसर्जन केले. एकूण मूर्तींपैकी १०५१० मूर्ती पीओपीच्या तर, ७३९२ मूर्ती शाडू मातीच्या होत्या. कृत्रिम तलाव, फिरते विसर्जन पथक, हौद, स्वीकृती केंद्र येथील सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन झाल्यावर पाण्याच्या तळाशी जमणाऱ्या मातीच्या गाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रक्रिया केली जाणार असल्याची माहितीही प्रधान यांनी दिली.

मूर्ती विसर्जन टक्केवारी

सातव्या दिवसापर्यंत झालेल्या एकूण विसर्जनात कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण ७० टक्के असून गतवर्षी ते ५१ टक्के होते. तर, खाडीत थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींचे प्रमाण यंदा ६ टक्के असून गतवर्षी ते ३८ टक्के होते. त्याचबरोबर, विशेष टाकी व्यवस्था (हौद) यातील विसर्जनाचे प्रमाण यंदा २० टक्के असून ते गतवर्षी ८ टक्के होते. तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील प्रमाण यंदा चार टक्के आहे असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे.

स्वीकार केंद्रात भाविकांनी दिल्या २६२ मूर्ती

जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाईट्स-आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, देवदया नगर-शिवाई नगर या १० ठिकाणी महापालिकेने मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली आहेत. या केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २६२ गणेश मूर्तींचे महापालिकेच्यावतीने स्वीकृती केंद्राच्या जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये विधिवत विसर्जन करण्यात आले.

१६ टन निर्माल्य भक्तांनी केले दान

यंदा निर्माल्यापासून बायो कंपोस्टिंग पद्धतीने खत करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या खत प्रकल्पात निर्माल्य जमा करण्यात आले. कोलशेत, कौसा, ऋतू पार्क येथे हे बायोकंपोस्टिंग प्रकल्प कार्यान्वित आहेत. सातव्या दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १६ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच, निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. दिड दिवसाच्या मूर्ती विसर्जनानंतर १५ एवढे निर्माल्य जमा झाले. तर, पाचव्या दिवशी ०६ एवढे निर्माल्य जमा झाले आहे.

कृत्रिम तलावांची व्यवस्था

आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाई नगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्स- टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२, उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर, आत्माराम पाटील चौक आदी २४ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, सहा फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींसाठी कोपरी, पारसिक रेती बंदर, रेतीबंदर -१, रेतीबंदर-२-राणानगर, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम आदी ०९ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था आहे.