लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: येथील वाडेघर भागातील एका २२ वर्षांच्या तरुणाला त्याच्या घराजवळून पळून नेऊन त्याला मोटारीत, सार्वजनिक रस्त्यावर बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न रविवारी रात्री नऊजणांच्या टोळीने केला. या मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली तर आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी टोळक्याने दिली.

कल्याण, डोंबिवलीतील वाढत्या घरफोड्या, हाणामारी, खुनाच्या घटनांवरून शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. कल्याण पश्चिमेतील वाडेघर येथील चंदनशिवे नगरमध्ये राहत असलेल्या मयूर दत्तात्रय शिवदास (२२) या तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण करून जखमी केले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा… शहापूर उपजिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांतर्फे आदिवासींसाठी आरोग्य शिबीर

जय वाघे (३५), समा भालेराव (३३), भूमीत पाटील (३०), ओमकार शिरोसे (२५), रुपेश गायकवाड (२६), आणि इतर अनोळखी चारजण अशी आरोपींची नावे आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रारदार मयूरच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा… डोंबिवलीत चार भूमाफियांवर गुन्हे दाखल; कुंभारखाणपाडा, नवापाडामध्ये उभारल्या बेकायदा इमारती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी सांगितले, जखमी मयूर रविवारी रात्री नऊ वाजता घराच्या परिसरात उभा होता. तेथे आरोपी नऊजण आले. त्यांनी मयूरला जबरदस्तीने एका मोटारीत बसविले. त्याला बेदम मारहाण करत वडवली उड्डाण पूल येथे नेले. तेथे त्याला लोखंडी सळई, बांबू, हाॅकी स्टीकने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तू पोलीस ठाण्यात तक्रार केली तर तुझ्या आई, वडिलांना मारून टाकू, अशी धमकी देऊन आरोपी तेथून पळून गेले. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.