ठाणे – भिवंडी निजामपूर शहर महापालिका कार्यक्षेत्रात येत्या ७ जून ते ९ जून २०२५ या कालावधीत बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज झाले असून अवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. ईदगाह कत्तलखान्याकडे जाणारा मुख्य रस्ता तसेच इतर ३४ ठिकाणचे रस्ते देखील दुरुस्त करण्यात आले आहेत. काही ठिकाणी उघड्या गटारांवर चेंबर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
या वर्षी एकूण ५६ ठिकाणी कुर्बानी करण्यासाठी परवानगीचे अर्ज प्राप्त झाले होते. प्रभाग समिती स्तरावर त्यांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. कुर्बानीनंतर स्वच्छतेसाठी २०० टेम्पो, १४ जेसीबी, ११ जीप आणि ३ फराना या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, पाणी टाकण्यासाठी ४० टँकर अधिग्रहित करण्यात आले आहेत. जनावरांची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून ६० पशुवैद्यकीय अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मौलाना, कसाई तसेच व्यापारी संघटनांसोबत बैठका घेऊन त्यांचे सहकार्य निश्चित करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला आदेश दिले की कुर्बानीनंतर स्वच्छतेचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी प्रत्येक टेम्पोला क्रमांक देऊन प्रभागनिहाय वाटप करावे. पाणी पुरवठा विभागाने स्वच्छतेसाठी त्वरित पाण्याचे टँकर संबंधित भागात पाठवावेत आणि नंतर आरोग्य विभागाने औषध आणि पावडर फवारणी करावी. तसेच, अपशिष्ट टाकण्यासाठी करण्यात येणाऱ्या खड्ड्यांमध्ये वेळोवेळी औषध फवारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या बकरी ईदच्या कालावधीत नियमित कचरा उचलण्याचे काम बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातील कचरा सुरक्षितरित्या साठवून नंतरच घंटागाडीत टाकावा, जेणेकरून दुर्गंधी आणि रोगराई पसरणार नाही. महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजनबद्ध काम करावे आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.