व्यास क्रिएशनच्या वतीने वाचन संस्कृती जोपासणारा पुस्तक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. २३ एप्रिलला जागतिक ग्रंथ दिनाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
प्रत्येक दिवशी पुस्तक प्रकाशन हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. व्यास क्रिएशन प्रकाशित २०० पुस्तकांचा बालसाहित्याचा खजिना येथे उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात १४ लेखकांची २५ हून अधिक पुस्तके प्रकाशित होणार आहेत.
काव्य, शास्त्र विनोदाचे अनेक जाणकार महोत्सवाला उपस्थित राहून महोत्सवाची उंची वाढविणार आहेत. २ मे ला सकाळी १० वाजता पुस्तकांसारखी अनमोल गोष्ट जगण्याच्या केंद्रस्थानी आणण्याची अफलातून संकल्पना मांडणारे ज्येष्ठ लेखक संजय भास्कर जोशी यांच्या हस्ते महोत्सवाचा समारोप होणार आहे.
या वेळी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य महादेव जगताप हेही या वेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच २ मे रोजी शिक्षकांमधील लेखकांचा शोध घेण्याच्या उद्देशाने खजिना राज्यस्तरीय बालसाहित्य लेखन स्पर्धा होणार आहे.
४०० प्रवेशिका
या स्पर्धेला २ जिल्ह्य़ांतील ४०० हून अधिक शिक्षकांनी प्रवेशिका पाठविल्या आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सकाळी १० वाजता सरस्वती क्रीडासंकुल, नौपाडा, ठाणे (प.) येथे होणार आहे. या वेळी पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर, ज्येष्ठ लेखक संजय जोशी, नाटककार शशिकांत कोनकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा महोत्सव अभिनव असून यानिमित्ताने वाचन चळवळ जोमाने वाढेल, असा विश्वास व्यास क्रिएशनचे संचालक नीलेश गायकवाड यांनी सांगितले.