ठाणे - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम ठाणे जिल्ह्यात १ ऑगस्ट पासून सुरू राबविण्यात येणार आहे. आधार क्रमांक जोडणी ऐच्छिक असल्याने जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी. यासाठी राजकीय पक्ष आणि संघटनांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या सुमारे ८ लाख १८ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे काही केंद्रांवरील मतदारांची संख्या कमी झाली आहे. तर पलावा सारख्या गृहसंकुलामध्ये एका मतदान केंद्रावर ५ हजारहून अधिक मतदारांची नोंद झाली आहे. अशा ठिकाणी पाच मतदान केंद्रे मंजुर करण्याचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक विभागातर्फे पाठविण्यात आला आहे. येत्या दीड वर्षात आणखी मतदार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण करण्यात येणार असल्याचे अर्चना कदम यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली आहे आहे. या बैठकीला जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थिती होते. यावेळी या सर्व प्रतिनिधींना मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिमेबाबत माहिती देण्यात आली. मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी विशेष मोहिम १ ऑगस्ट पासून होणार आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येने आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. तसेच आगामी गणेशोत्सव, नवरात्रीमध्ये मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्याचे तसेच सुधारित अर्जानुसारच मतदारांनी मतदार यादीतील बदल अथवा नोंदणीची प्रक्रिया करावी असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. अशी होईल नोंदणी१ एप्रिल २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधारक्रमांक अर्ज क्र.६ ब मध्ये भरून देऊ शकतो. आवश्यक अर्ज क्र. ६ ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध केला जाणार असून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. ६ ब निवडणूक आयोगाच्या विविध माध्यमांवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.