छत्रपती शिवाजी  महाराज हे महाराष्ट्राच्या, मराठीच्या इतिहासाचा आरंभबिंदू नसून एका ऐतिहासिक प्रक्रियेचा कळसबिंदू होते; तसेच संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्याचा आरंभबिंदू नसून तो एका साहित्यिक सांस्कृतिक प्रक्रियेचा कळसबिंदू होता,’’ असे विचार संतसाहित्याचे गाढे अभ्यासक अरविंद दोडे यांनी मांडले.
कल्याण पूर्व येथील ‘श्री ज्ञानेश्वर माउली सार्वजनिक ग्रंथालया’ने मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दोनदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. पहिल्याच दिवशी दोडे यांनी ‘मायमराठी’चे महत्त्व अधोरेखित केले. मराठी मातीतल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवराय या नावांमध्ये खूप मोठी जादू होती. भूतकाळातील व वर्तमानकाळातील मराठी संस्कृतीला व्यापून टाकणारी ती महान प्रतीके होती. याच प्रतीकांनी मराठी भाषा केवळ वाढविली नाही, तर समृद्ध केली, असे मत दोडे यांनी मांडले.
विज्ञानदिनी बीएआरसीच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनुपमा कुलकर्णी यांनी बिग बँग थिअरी आणि गॉड पार्टिकल (देवकण) संशोधनावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. या वेळी विज्ञान भारती या संस्थेचे विज्ञान प्रदर्शनही लावण्यात आले होते. ग्रंथालयाच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त काव्यवाचन झाले.