बदलापूरः बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने पहिल्यांदाच मे महिन्यात रौद्ररूप धारण केले. त्यामुळे बदलापूर शहरात पुन्हा पुरस्थिती निर्माण होते की काय असे चित्र निर्माण झाले. उल्हास नदीला येऊन मिळणाऱ्या स्रोतांमध्ये भिमाशंकर, नेरळ, माथेरान आणि वांगणी परिसरात अवघ्या काही तासांत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळेच उल्हास नदीत अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासकांनी दिली आहे. याचवेळी जर बदलापुरात पाऊस कोसळला असता तर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असती.

बदलापूर शहरात सोमवारी पूरस्थिती निर्माण झाली होती. यंदा नदीने मे महिन्यातच इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे मे महिन्यातच पूर येतो की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र सकाळी ११ च्या सुमारास इशारा पातळी ओलांडणारी उल्हास नदी सायंकाळी चारच्या सुमारास इशारा पातळीवरून खाली आली होती. दुपारच्या सुमारास उल्हास नदी १७.५० मीटर या धोका पातळीजवळ पोहोचली होती. मात्र सुदैवाने शहरात पाणी शिरले नाही.

मात्र मे महिन्यात अचानक इतकी भीषण स्थिती का निर्माण झाली असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. कोकण हवामान अभ्यासक अभिजीत मोडक या खासगी हवामान अभ्यासकांनी केलेल्या विश्लेषणानुसार उल्हास नदीला येऊन मिळणाऱ्या जलस्रोत आणि त्याच्या आसपासच्या परिसरात ढगफुटीसदृश्य पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. सोमवारी पहाटे पावसाचा जोर अधिक होता. या काळात बदलापुरसारख्या शहरात अवघ्या चार तासांत १६० मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस पडला. त्याचवेळी भिमाशंकर या ठिकाणी तब्बल ३२१ मिलीमीटर इतका पाऊस पडला. माथेरान येथे २४ तासात १८१ मिलीमीटर तर खांडी या घाटमाथ्यावरच्या सावळे गावाजवळील केंद्राजवळही ३५४ मिलीमीटर इतका पाऊस पडला. नेरळजवळच्या कळंब परिसरातही असाच पाऊस कोसळला. त्यामुळे या भागातून वाहून उल्हास नदीला येऊन मिळणारे नैसर्गिक नाले दुथडी भरून वाहिले. या पावसाच्या पाण्याने उल्हास नदीत अधिकचे पाणी दिले. त्याचवेळी बदलापूर, वांगणी या परिसरातही विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस कोसळला. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे पहाटेच्या वेळी वळव्याचा वाटणारा पाऊस दुपारी उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ करून गेला.

कर्जत, खंडाळा कमीविशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातही चांगला पाऊस कोसळत असताना उल्हास नदीत पाण्याची भर घालणाऱ्या कर्जत शहरात कमी पावसाची नोंद झाली. खंडाळा परिसरातही सरासरीच पाऊस पडला. या भागात अधिकचा पाऊस झाला असता तर परिस्थिती भीषण झाली असती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धोका कायम

माथेरान, नेरळ, कर्जत, भिमांशकर या भागात कायमच अधिकचा पाऊस पडतो. यापूर्वीही जेव्हा जेव्हा बदलापुरात पूरस्थिती निर्माण झाली. त्या त्या वेळी या भागात अधिकचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे बदलापुरात पाऊस पडला नाही तरी शहरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते.