ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १५ आणि १६ मार्च रोजी जाणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी हे ठाणे शहरात सभा घेणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रा भिवंडी आणि ठाणे शहरातून जाणार आहे. या यात्रेचे नियोजन आणि कार्यक्रमांची आखणी करण्यासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी ठाणे काँग्रेस मुख्यालयात बैठक घेऊन कार्यकर्त्यांना सूचना केल्या.
हेही वाचा >>> पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण, ठाणे पोलिसांनी केली ७ आरोपींना अटक
ही यात्रा १२ मार्चला गुजरातमधून राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक मार्गे ती १५ मार्चला वाडा, भिवंडी येथे येणार आहे. या दिवशी ते भिवंडीत थांबणार आहेत. १६ मार्चला ही यात्रा ठाणे शहरात येणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची सभा होणार आहे. यानंतर ही यात्रा मुलुंड येथे थांबेल आणि १७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. भिवंडी येथून मुंबई-नाशिक महामार्गे भारत जोडो न्याय यात्रा खारेगाव मार्गे मुंब्रा-कौसा, कळवा, कोर्टनाका, जांभळीनाका, राम मारुती रोड, गोखले रोड, तीन हात नाका येथून मुलुंडला जाईल. जांभळी नाका येथे राहुल गांधी हे यात्रेच्या वाहनावरूनच सभा घेऊन संवाद साधणार आहेत.