ठाणे : राज्य परिवहन उपक्रमाच्या (एसटी) बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. त्याचा फटका स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असतानाच, एसटी महामंडळाच्या जागा ९९ वर्षाच्या कराराने भाडेतत्त्वावर देऊन शासनाचा खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. या खासगीकरणाविरोधात ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून एसटी स्थानकातील खड्डे बुजवले.
राज्य परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या राज्यातील विविध मार्गांवर चालविण्यात येतात. या बसगाड्यांमधून अनेक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांची संख्या मोठी आहे. राज्य परिवहन उपक्रमाचे राज्यात अनेक बस थांबे आहेत तर, अनेक ठिकाणी बस आगार आहेत. त्यापैकी काही बस आगारांची दुरावस्था झाली असून त्याचा फटका स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. असे असतानाच, एसटी महामंडळाच्या जागा ९९ वर्षाच्या कराराने भाडेतत्त्वावर देऊन शासनाचा खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
राज्य शासनाचा हा डाव उधळून लावण्यासाठी, आणि बस स्थानकांच्या व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी, ठाणे काँग्रेसतर्फे शनिवारी ठाणे पश्चिम स्थानकाजवळील बसआगारात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. एसटी महामंडळ त्यांच्या बसस्थानकांना सार्वजनिक, खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे. यावेळी एसटीचे खासगीकरण बंद करा, एसटीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
आगारातील रस्त्यांवर खड्डे भरणी
एसटी आगार खाजगीकरणासह आगारातील खड्ड्यांचे साम्राज्य ,स्वच्छता गृहांची दुरावस्था, बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे, महामंडळांच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिमेंट मिक्सर वाहने आणून काँक्रीटद्वारे आगारातील खड्डे बुजविले. यावेळी चव्हाण म्हणाले, “ ठाणे आगाराची अत्यंत दुरावस्था झाली आहे. आतापर्यंत शहरात कोट्यावधी रुपये काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणावर खर्च करण्यात आले. परंतु शहरातील बस स्थानक दुर्लक्षित का, तसेच एसटी स्थानके भाडेतत्वावर देत खाजगीकरणासाठी पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्याच शहरात एसटी प्रवाशांना मूलभूत सोयी सुविधा पुरवू शकत नाही, ही खेदाची बाब आहे.”