लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुंब्रा येथे काही दिवसांपूर्वी दामत्याने त्यांच्या दीड वर्षांच्या मुलीची हत्या करून तिला दफन भूमीत पुरल्याचे समोर आले होते. मुलीच्या हत्ये मागील कारणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. दाम्पत्याला तीन मुली होत्या. दीड वर्षीय मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने त्यांनी तिची हत्या केल्याची कबूली दिली आहे.

मुंब्रा येथील शिवाजी नगर भागात मुलगी लबीबा ही तिचे वडिल जाहीद शेख (३८), आई नूरानी, दोन भाऊ आणि दोन बहिणींसोबत राहात होती. १८ मार्चला लबीबा हिचा आई- वडिलांनी एका दफन भूमीमध्ये तिचा मृतदेह पुरला होता. या घटनेनंतर ठाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक या कार्यालयात एक पत्र आले. या पत्रामध्ये लबीबाचे छायाचित्र होते. तसेच मुलीला भूत-प्रेताची बाधा असल्याने तिची हत्या करून तिला दफन भूमीत परस्पर पुरल्याचे पत्रात म्हटले होते. पोलिसांनी हे पत्र गांभीर्याने घेऊन दफन भूमित पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला. त्यावेळी मुलीच्या डोक्यावर पोलिसांना कापलेल्या जखमा आढळून आल्या.

आणखी वाचा-ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती

पोलिसांनी तात्काळ मुलीच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. त्यांची चौकशी करत असताना, भूत-बाधा झाल्याचा बनाव त्यांनी रचण्यास सुरूवात केली. अखेर पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांना पाच पैकी तीन मुली होत्या. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले असे कुटुंब हवे होते. त्यामुळे त्यांनी दीड वर्षांच्या मुलीची डोक्यात चाकूने वार करून हत्या केल्याचे कबूल केले. यापूर्वी त्यांनी चार वर्षांच्या मुलीच्या हत्येचा प्रयत्न केला होता. परंतु तिचे प्राण वाचले होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

दाम्पत्याला आठ आणि सात वर्षांचे मुले, तर पाच, चार आणि दीड वर्षांच्या मुली होत्या. दीड वर्षांच्या मुलीच्या हत्येनंतर पोलिसांनी पालकांना अटक केली आहे. त्यामुळे आता चारही मुलांना बालसुधार गृहामध्ये पाठविण्यात आले आहे.