डोंबिवली – येथील एमआयडीसी मधील रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमधून प्रक्रिया केलेले लाल रंगाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी गुरुवारी दुपारी रस्त्यावर वाहू लागल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातवरण पसरले.एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्याचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमधून काही वेळा सांडपाण्याचा प्रवाह वाढल्याने पाणी चेंबर मधून रस्त्यावर येते, असे एका उद्योजकाने सांगितले.

गुरूवारी सकाळपासून पाऊस कोसळत असताना रसायन मिश्रित लाल रंगाचे पाणी खंबाळपाडा रस्त्यावर वाहू लागल्याने पादचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या पाण्याला दुर्गंधी येत आहे.एमआयडीसीकडून कंपन्यातील प्रक्रिया केलेले सांडपाणी बंदिस्त नाल्या मधून सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वाहून नेण्यात येते. या पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर ते सांडपाणी पुन्हा बंदिस्त नाल्याद्वारे खाडीत सोडण्यात येते. बंदिस्त वाहिनी टाकण्याचे एमआयडीसी कडून काम सुरु आहे. प्रक्रिया प्रकल्पापर्यंत सांडपाणी वाहन नेणाऱ्या नाल्यात अनेक ठिकाणी राडारोडा कचरा टाकला जात असल्याने नाले जागोजागी तुंबतात. या नाल्याची सफाई एमआयडीसीकडून करण्यात आली नसल्याने पावसाचे पाणी, कंपन्यांमधून सोडण्यात आलेले सांडपाणी जागोजागी तुंबते. त्यामुळेच टाटा पॉवरकडून खंबाळपाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर या नाल्यातील सांडपाणी चेंबरमधील पाणी साठवण क्षमता संपल्याने रस्त्यावरून वाहत असावे, असा अंदाज उद्योजकांनी वर्तविला.

हेही वाचा >>>ठाण्याच्या खाडीवर जलपर्णीचा गालीचा, पावसामुळे उल्हासनदीतील जलपर्णी वाहून आली खाडीपात्रात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण अंबरनाथ मॅन्यफॅक्चरर्स असोसिएशनचे (कामा) कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले, एमआयडीसी हद्दीतील नाले, गटार सफाई करण्यात आलेली नाही. दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर आलेले लाल रंगाचे सांडपाणी नक्की कोठुन आले आहे याची आम्ही माहिती घेत आहोत. प्रदूषण करणाऱ्या कंपन्या रंगेहाथ सापडल्या तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कामा संघटना आग्रही असल्याने आता कोणीही उद्योजक प्रदूषण करण्यासाठी धजावत नाही. आता काहीही झालेले तरी खापर कंपन्यांवर फोडण्यास प्रत्येक जण तयार असतो. नालेसफाई झाली नाही याविषयी कोणीही काही बोलत नाही. मात्र लाल पाणी रस्त्यावर आल्या बरोबर कंपन्यांना तात्काळ लक्ष्य करण्यात आले. एमआयडीसी हटविण्याची मागणी तथाकथित करत आहेत. मग दीड लाख बेरोजगारांना काम कोण मिळून देणारे, त्यांचे कुटुंबगाडे कसे चालणार याचा पण संबंधितांनी विचार करावा, असे सोनी यांनी सांगितले.