ठाणे- ज्या लोकसभेला उज्ज्वल परंपरा आहे. त्या सभागृहात भाजपचे खासदार रमेश बिधूडी यांनी असंसदीय शब्द वापरून सभागृहाची संस्कृती कलंकित केली आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष ओम बिर्ला हे त्यांचे शब्द कामकाजातून काढत नसून हा प्रकार धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे भाजपने या प्रकरणी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी इंडिया आघाडीचे प्रवक्ते आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. संसदेत असंसदीय शब्द वापरून सामाजिक अशांततेला पूरक वातावरण निर्माण करणारऱ्या बिदूर यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आतापर्यंत लोकसभेत सुसंस्कृत मुल्यांचे प्रदर्शन व्हायचे. पण, बोलताना तारतम्य बाळगले जायचे. कधी कोणी असंसदीय शब्द वापरला तर माफी मागितली जायची. पण, या विशेष अधिवेशनाला कलंकित करणारा प्रकार काल भाजपचे दिल्लीतील खासदार रमेश बिदूर यांनी केला आहे, असेही ते म्हणाले. या लोकसभेला पंडीत नेहरू, बहुगुणा, फिरोज गांधी, लोहिया, दंडवते, बॅ. पै यांच्यासारख्या महान लोकांची परंपरा लाभली आहे. अशा वेळेत जर देशाला लोकसभेतून शिव्या ऐकाव्या लागत असतील तर या देशातील राजकारणाचा स्तर किती ढासळत आहे, हेच दिसून येत आहे, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांच्या नावे विश्वकर्मा समाजासाठी कर्ज योजना लागू केली आहे. या योजनेचा अभ्यास केल्यावर असे दिसते की जर तुम्ही जातीने सुतार असाल आणि सुतार काम करत असाल तरच तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे.

हेही वाचा >>>मानवी भावनांचे कॅनव्हाॅसवरील ग्रामीण चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एककडे संविधानाच्या माध्यमातून जात व्यवस्था तोडण्यासाठी आपण मागे लागलो होतो. आता पुन्हा जातीव्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन नुकतेच पार पडले. भाजपने सभागृहात महिला विधेयक आणले. ते मंजूरही झाले आहे. पण, हे विधेयक काँग्रेसच्या काळातच मांडण्यात आले होते. या विधेयकात मागासवर्गीय, अल्पसंख्यांक महिलांना कोणतेही स्वातंत्र्य आणि स्थान भाजपने दिलेले नाही. यामुळेच ओबीसी, अनुसूचित जाती- जमातींची जनगणना व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागासवर्गीय महिलांना जर या विधेयकाचा लाभ झाला तरच खऱ्या अर्थाने समाजाला फायदा होईल. असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.