ठाणे : शहरातील रस्ते, साफसफाई, उद्यान आणि मलनिस्सारण कामात त्रुटी आढळून आल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभियंत्यांसह ठेकेदारांना दणका दिला आहे. अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस तर कंत्राटदार कंपनीला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे अभियंत्यांसह ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणेकरांना चांगल्या दर्जाचे आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत या उद्देशातून शहरात रस्ते नुतनीकरण आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. राज्य सरकारकडून उपलब्ध झालेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून ही कामे सुरू आहेत. या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पाहाणी केली. या दौऱ्यादरम्यान रस्ते साफसफाई तसेच इतर कामांबाबत त्रुटी आढळून आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली आहे. यामध्ये वसंत विहार येथील कॉनवुड चौक येथील मलनिस्सारण कामास विलंब झाल्याबद्दल कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठाणे शहरातील वर्तकनगर, लोकमान्य- सावरकरनगर, नौपाडा, कोपरी, कळवा प्रभाग समितीमधील विविध रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. हे काम मे. आर.पी. एस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मास्टीक, अस्फाल्ट पध्दतीने डांबरीकरणाची कामे करणाऱ्या कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बुट, हात मौजे, शिरस्त्राण उपलब्ध करुन देण्यात आलेले नसल्याचे दौऱ्यात दिसून आले होते. त्यामुळे आयुक्त बांगर यांनी या कंत्राटदार कंपनीला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. वर्तकनगर प्रभागसमिती अंतर्गत येत असलेल्या पवार नगर येथील रस्ते साफसफाईचा ठेका व्यंकटेशा या कंपनीस देण्यात आलेला आहे. परंतु नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन रस्त्याची योग्य प्रकारे साफसफाई होत नसल्याचे तसेच कर्मचाऱ्यांना गणेवश आणि इतर सुरक्षा साधने देण्यात आली नसल्याचे दौऱ्यात आढळून आले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग निदर्शनास आल्याने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावून दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच कामकाजात अपेक्षीत सकारात्मक सुधारणा झाली नाहितर कंत्राट मुदतपूर्व संपुष्टात आणून आपणास काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा सादर करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी नोटीशीद्वारे दिले आहेत.

हेही वाचा… तीन शहरांना एकच नगररचनाकार; अंबरनाथच्या नगररचनाकारावर बदलापूर, उल्हासनगरची जबाबदारी

उद्यानांची दुरावस्था

टिकूजीनीवाडी सर्कल ते नीळकंठ येथील रस्ता दुभाजक आणि हरित जनपथ या ठिकाणी निगा व देखभाल योग्यरित्या नसल्याचे आयुक्त बांगर यांना दौऱ्यात आढळून आले आहे. या ठिकाणी झाडे सुकलेल्या अवस्थेत आहेत. तसेच या ठिकाणी पालापोचाळा, प्लॅस्टिक व इतर कचरा साठलेला दिसून आला होता. याप्रकरणी मे. निसर्ग लॅण्डस्केप प्रा.लि. या कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्त बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच सुकलेली झाडे काढून तेथे नवीन झाडे लावणे, मोकळया जागेत नव्याने झाडे लावणे आणि जंगली गवत काढण्याचे निर्देशही दिले आहेत. तसेच गावंडबाग ते हिरानंदानी मिडोज येथील रस्ता दुभाजक आणि हरित जनपथात अनेक ठिकाणी झाडे लावून सुशोभिकरण करणे अपेक्षित असताना मोकळ्या जागा आयुक्त बांगर यांना निदर्शनास आल्या. तसेच रस्ता दुभाजक आणि हरित जनपथात अनेक ठिकाणी गवत नियमित काढले जात नसल्याने त्याची वाढ मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. तसेच झाडांना नियमित पाणी दिले जात नसल्याने झाडे सुकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मे. पायोनिअर आऊटडोअर मिडीया सोल्युशन प्रा.लि. या कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्त बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

हेही वाचा… भिवंडीत ४१ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर कारवाई होणार

महापालिका क्षेत्रातील उद्याने अद्ययावत रहावीत यासाठी ठेकेदार पध्दतीने जाहिरातीच्या बदल्यात उद्यान, चौक व ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करण्याबाबतचा करार करण्यात आला आहे. मे. पायोनिअर आडटडोअर मिडीया सोल्युशन प्रा.लि. कंपनीला वर्तकनगर प्रभागसमिती गावंडबाग ते हिरानंदानी मिडोज येथील दुभाजक व हरित जनपथाची निगा देखभाल करणे. मे. रोनक ॲडर्व्हटायझिंग या कंपनीला एमएमआरडीए व एमएसआरडीसी ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करणे, ठाणे शहरातील ५० चौक तसेच ठाणे स्थानक परिसर सुशोभित करणे. मे. ॲड स्पेस पब्लिसिटी एलएल पी यांना जेल तलाव ते गोल्डन डाईज नाका, तीन पेट्रोल पंप ते मखमली तलाव, भास्कर कॉलनी ते नौपाडा प्रभाग समिती येथील ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करणे. तसेच सारथी ॲडर्व्हटायझिंग यांना रमाबाई आंबेडकर उद्यान सुशोभिकरणाचा ठेका देण्यात आला आहे. या कंपनीबरोबर केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार उद्यानांची दैनंदिन निगा व देखभाल योग्यप्रकारे राखली गेली नाहीतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.