ठाणे : वसंत विहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे एका २७ मजली इमारतीतील सदनिकेत अचानक आग लागली. या आगीतून कुटुंबियांना वाचविताना अरुण केडिया (४७) यांचा मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. अरुण यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

तुळशीधाम येथे नीळकंठ पामस् ही २७ मजली इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अरुण केडिया हे त्यांचे वडील नाथमल (७१), पत्नी अनिशा (४३), मुलगी अनन्या (१७) आणि मुलगा अविनाश (१२) यांच्यासोबत वास्तव्यास होते. बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या सदनिकेत अचानक आग लागली. या आगीनंतर अरुण यांनी त्यांच्या कुटुंबियांना सदनिकेतून बाहेर काढले. परंतु ते बाहेर पडू शकले नाही.

हेही वाचा – डोंबिवलीत आजदे गावात रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी, परिसरातील रहिवाशांचे येण्या-जाण्याचे मार्ग बंद

हेही वाचा – ठाणे : पिकवलेला भाजीपाला ‘ई कार्ट’द्वारे घरपोच

घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन, अग्नीशमन दल आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इतर रहिवासी देखील इमारतीखाली आले होते. पथक सदनिकेत गेले असता, अरुण हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले. पथकांनी सदनिकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले होते.