ठाणे : वन मंत्री गणेश नाईक यांंनी ठाण्यात दुसऱ्यांदा जनता दरबार भरविला. परंतु या जनता दरबारात अर्धे सभागृह रिकामे असल्याचे चित्र होते. तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव आणि ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही या जनता दरबाराकडे पाठ फिरवल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे ज्या वेळेस गणेश नाईकांनी दरबार भरविला. त्याच वेळेत भाजपच्या खोपट कार्यालयात आमदार संजय केळकर यांनीही त्यांचा ‘जनसेवकाचा जनसंवाद’ हा उपक्रम घेतला होता. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या होत्या.
वन मंत्री गणेश नाईक यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी ठाण्यातील खारटन रोड येथील एका सभागृहात जनता दरबार भरविला होता. या जनता दरबारात ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आले होते. नागरिकांच्या समस्या तेथेच सोडविण्याला नाईक यांनी प्राधान्य दिले होते. त्यानंतर आता शुक्रवारी पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार भरविला होता. हा जनता दरबार ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित केला होता. परंतु या जनता दरबारात अर्धे सभागृह रिकामे असल्याचे चित्र होते. पहिल्या १० ते १२ रांगा वगळता इतर सभागृहातील खुर्च्या रिकाम्या होत्या.
तसेच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ. डी.एस. स्वामी उपस्थित होते. परंतु ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या दरबारात उपस्थित नव्हते. महापालिकेचे आणि पोलीस अधिकारी मात्र दरबारात उपस्थित होते. विशेष म्हणजे, ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही याच वेळेत ‘जनसेवकाचा जनसंवाद’ हा उपक्रम घेतला होता. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात हा उपक्रम सुरू होता. या उपक्रमांतर्गत संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात. परंतु नाईकांच्या दरबाराच्या वेळेतच केळकर यांनीही दरबार भरविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
गणेश नाईक यांच्या दरबारात सभागृह रिकामे असले तरी, त्यांच्याकडून नागरिकांच्या समस्येचा तात्काळ निपटारा करण्याचा प्रयत्न सुरू होता. क्लस्टर योजना नको, पाणी समस्या, महापालिका किंवा इतर सरकारी यंत्रणांकडे रखडलेल्या परवानग्या, मुलांसाठी नोकऱ्या अशा विविध समस्या घेऊन ठाणेकर आले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती. तसेच वसई येथील नागरिक देखील त्यांच्या समस्या घेऊन नाईक यांच्या दरबारात आले होते.