ganesh naik : ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र, या विमानतळाच्या नामकरणावरून वाद रंगला आहे. विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भुमिपुत्रांसह राजकीय नेत्यांकडून होत असून यासाठी आंदोलनाचे इशारे देण्यात येत आहेत. असे असतानाच, त्यावर आता वन मंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाण्यातील मोह विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री गणेश नाईक यांनी हे उपस्थित होते. तर, विशेष अतिथी म्हणून आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “मी स्वतः या विद्यालयाचा विद्यार्थी राहिलो आहे. त्या काळी एस.व्ही. कुलकर्णी सर प्राचार्य होते. मी येथे अकरावी शिक्षण घेतले आणि नंतर ठाणे कॉलेजला गेलो. त्यामुळे या शाळेशी आपलेपणाची भावना आहे. या शाळेचे कार्य अधिक मोठ्या प्रमाणावर व्हावे, ही धारणा ठेवून मी आज येथे आलो आहे,” असे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
गोर-गरिबांवर होणारा अन्याय दूर करणार
येत्या ६ ऑक्टोबर रोजी गडकरी रंगायतन येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. “ज्या नागरिकांवर अन्याय झाला आहे, ज्यांना शंका-कुशंका आहेत, त्यांनी या दरबारात यावे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार गोर-गरिबांवर होणारा अन्याय दूर करण्यास कटिबद्ध आहे,” असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “या विषयावर माझ्या पक्षाचे प्रवक्ते सक्षम आहेत. त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही,” असे नाईक म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाविषयी मी नंतर बोलेन,” असे त्यांनी सांगत याविषयावर बोलणे टाळले.
तर तलवारी, भाले काढायची काय गरज
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराबाबत पत्रकारांनी गणेश नाईक यांना प्रश्न विचारला असता, त्यावर त्यांनी प्रतिक्रीया दिली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन दिवसांपुर्वी चर्चा झाली आहे. शुक्रवारी सह्याद्री अतिथिगृहात आगरी समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक होणार आहे. कुठलीही गोष्ट युद्ध करता न मिळत असेल तर, त्यासाठी तलवारी आणि भाले काढायची का गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.