ठाणे : वाहतूक बदल, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामे, मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असतानाच, गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर अवेळी होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे सकाळ आणि सांयकाळी गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा फटका फटका नोकरदार वर्गासह शाळेच्या विद्यार्थ्यांना बसू लागला आहे.
नवे ठाणे म्हणून घोडबंदरचा परिसर ओळखला जातो. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. याठिकाणी नवनवीन गृह प्रकल्प उभे राहत आहेत. या भागातील नागरिक दरररोज कामानिमित्ताने घोडबंदर मार्गे वाहतूक करतात. तसेच उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेने होणारी अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गे सुरू असते. या वाहतुकीमुळे नोकरदार वर्गाला कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ या वेळेतच अवजड वाहनांना ठाणे आणि घोडबंदर मार्गे वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, या नियमांचे अवजड वाहन चालकांकडून पालन होत नसल्यामुळे ठाणे आणि घोडबंदर मार्गावर कोंडी होऊ लागली आहे.
ठाणे शहरातील नितीन कंपनी उड्डाण पुल, माजिवाडा उड्डाण पुल, मानपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहतुकीला पहाटे ५ वाजेपर्यंत वाहतुकीची मुभा असली तरी ही वाहतूक सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असते. दुपारी ११ आणि रात्री ९ वाजताच अवजड वाहने शहराच्या वेशीवरून आत शिरतात. या सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत नोकरदार वर्गाची वाहने वाहतूक करतात. तर, सकाळ, दुपार आणि सायंकाळच्या वेळेत शालेय बसगाड्यांची वाहतूक सुरू असते. या काळात अवेळी अवजड वाहतूक होत असल्यामुळे कोंडी होत असून त्याचा फटका फटका नोकरदार वर्गासह शाळेच्या विद्यार्थ्यांना बसू लागला आहे.
घोडबंदर मार्गावरुन हजारो अवजड वाहनांची वाहतूक गुजरात, भिवंडी आणि उरण जेएनपीटी बंदराच्या दिशेने होते. अवजड वाहतुकीमुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. नौपाडा, पाचपाखाडी, चरई यासारख्या जुन्या ठाण्याच्या विस्तारास फारसा वाव राहिलेला नसल्यामुळे नागरिक आता घोडबंदर भागात गृहखरेदी करीत आहेत. या भागात मागील १५ वर्षांत मोठ्याप्रमाणात नागरिकरण झाले आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वडाळा-घाटकोपर- कासारवडवली ते गायमुख या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्त्यावर मार्गरोधक उभारल्याने रस्ता अरुंद झाला असून यामुळे मागील सात ते आठ वर्षांपासून कोंडी होत आहे. त्यात या मार्गावर खड्डे पडल्याने कोंडी वाढली आहे.
प्रतिक्रीयादररोज कामाला निघताना पूर्वीच्या वेळेपेक्षा अर्धा तास आधीच निघावे लागत असल्याचे येथील रहिवासी हेमंत वाईरकर यांनी सांगितले. तर, घोडबंदर मार्गावरून प्रवास करताना कोंडीचा मोठा अडथळा पार करावा लागतो. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. घोडबंदरमध्ये राहणे कठीण झाले आहे, असे येथील रहिवासी योगेश गांगुर्डे यांनी सांगितले. विविध निर्माण कामांमुळे वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्याचा प्रयत्न असतो, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.कोंडीचे नवे ठिकाणगेल्याकाही दिवसांपासून कासारवडवली मार्गावर उड्डाणपूल निर्माणाचे काम सुरू आहे. या कामामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर दररोज आनंद नगर, कासारवडवली भागात कोंडी होत आहे. यामुळे अनेकजण वाघबीळ उड्डाणपुलाखालून वळण घेऊन अतंर्गत मार्गाने वाहतूक करतात. त्यामुळे या मार्गावरही वाहनांची वर्दळ वाढली आहे. कापूरबावडी भागात मेट्रो स्थानकाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. कापूरबावडी चौकातून घोडबंदर येणारी वाहने पूर्व द्रुतगती महामार्गे मुंबई तर इतर वाहने ठाणे रेल्वे स्थानक परिसर, कोर्टनाका, भिवंडीच्या दिशेने जातात. मेट्रो कामामुळे माजिवडा, कापूरबावडी, तत्वज्ञान विद्यापीठ भागात कोंडी होत आहे. मानपाडा ते आर माॅल भागात सेवा आणि मुख्य रस्ता जोडणीचे काम सुरू आहे. या कामामुळे आर माॅल येथून मानपाडाच्या दिशेने वाहतूक करणारे चालक विरुद्ध दिशेने वाहतूक करतात. त्यामुळे या मार्गावरही कोंडी होते.