ठाणे : घोडबंदर येथील गायमुख घाटात सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणारे अवजड वाहन बंद पडले. यामुळे गायमुख घाटात वाहतुक कोंडी झाली आहे. गायमुख घाट, फाऊंटन हाॅटेल चौकापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. वाहतुक कोंडीमुळे वसई, विरार, मिरा भाईंदर भागातून ठाणे शहरात वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल होत आहेत.

मिरा भाईंदर येथून ठाण्याच्या दिशेने अवजड वाहन सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वाहतुक करत होते. हे वाहन गायमुख घाटातील चेना खाडी परिसरात आले असता, अचानक अवजड वाहन बंद पडले. घोडबंदर मार्गावरून हजारो वाहने वाहतुक करतात. वसई, विरार, मिरा भाईंदर भागातील नोकरदार देखील याच मार्गावरून वाहतुक करतात. परंतु अवजड वाहन बंद पडल्याने झालेल्या वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांचे आणि वाहन चालकांचे हाल झाले. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अवघ्या काही मिनीटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास प्रवाशांचा वाया गेला. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. दरम्यान, बंद पडलेले वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आले होते. परंतु वाहनांचा भार वाढल्याने आणि मार्गिका अरुंद असल्याने येथील वाहतुक कोंडी कायम होती. सकाळी ११.३० नंतरही वाहतुक कोंडी सुटू शकली नाही.

घोडबंदर आता कोंडीचे बंदर

ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर मार्गावरून हजारो हलकी वाहने तसेच उरण जेएनपीटी, भिवंडी येथून सुटणारी अवजड वाहने वसई, गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. याच मार्गावर मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली) आणि चार अ (कासारवडवली ते गायमुख) या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अडथळे बसविण्यात आले असून त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो. त्यामुळे घोडबंदर मार्गावर होणाऱ्या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवजड वाहनांना पर्याय केव्हा

घोडबंदर मार्गालगत मोठ्याप्रमाणात लोकवस्ती तयार झाली आहे. त्यामुळे हलकी वाहने वाहतुक करतात. तर अवजड वाहने देखील येथून वाहतुक करत असल्याने अपघात, वाहतुक कोंडी नित्त्याची झाली आहे. अवजड वाहनांना ठाणे शहरात प्रवेश टाळण्यासाठी पर्यायी मार्ग देण्याची घोषणा केली जात होती. परंतु हा प्रकल्प केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. हा प्रकल्प देखील अद्याप सुरु आहे. त्यामुळे घोडबंदरची कोंडी फुटणार केव्हा असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.