डोंबिवली: बुधवारी सकाळपासून आकाशात उन, काळ्या ढगांचा खेळ सुरू होता. दुपारी अचानक काळ्या ढगांनी आकाश भरून आले आणि बघता बघता जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. एक तास पावसाची कोसळधार झाल्याने रस्तोरस्ती पाणी साचले. कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयात, उदवाहनात आणि डोंबिवलीत खासदारांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावरील खोलगट भागात गुडघाभर पाणी साचले होते.

दुपारी अचानक सुरू झालेल्या पावसाने पादचारी आणि बाजारातील विक्रेते, व्यापाऱ्यांची सर्वाधिक दाणादाण उडवली. पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठी नागरिक अधिक संख्येने बाजारात येत आहेत. अनेक विक्रेत्यांनी दुकानातील सामान पदपथ आणि दुकानासमोरील मोकळ्या जागेत टांगून ठेवले आहे. अशा दुकानदारांची सर्वाधिक पळापळ झाली. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावर जवळ छत्री नसल्याने अडकून पडले होते.

मुसळधार पावसाने रस्तोरस्ती पाणी तुंबल्याने रिक्षा चालकांनी काही वेळ रिक्षा बंद ठेवणे पसंत केले. डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग कार्यालयासमोरील रस्ता पाण्याखाली गेला होता. नालेसफाई व्यवस्थित झाली असल्याचा दावा पालिकेने कितीही केला असला तरी उमेशनगर, देवीचा चौक भागातील अनेक गटारांची सफाई झाली नसल्याचा स्थानिक रहिवाशांचा दावा आहे. त्याचा फटका बुधवारी मुसळधार पावसामुळे स्थानिकांना बसला.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयात दुसऱ्या माळ्यावर अचानक पावसाच्या पाण्याची गळती सुरू झाल्याने आयुक्त दालनासमोरील मार्गिकेत पाणी साचले होते. एका उदवाहनात पावसाच्या धारा लागल्या होत्या. डोंबिवली एमआयडीसीत खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या सद्गुरू बंगल्यासमोरील रस्त्यावर खोलगट भाग असल्याने या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढत वाहन चालक शिळफाटा रस्त्याने जात होते. या भागातील खोलगट भाग उंच करावा, अशी अनेक वर्षांची प्रवाशांची मागणी आहे. पण त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

मागील तीन महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेले नागरिक मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सुखावला आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ पावसामुळे बसली असल्याने धुळीचा त्रास कमी झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी भात पेरणीची लगबग सुरू केली आहे. पावसाळी भाजीपाला लागवड करणाऱ्या व्यावसायिकांनी पावसामुळे भाजी लागवडीसाठी ओटे, मातीचे पठे तयार करण्यास सुरूवात केली असल्याचे ग्रामीण भागात दृश्य आहे.