कल्याण – कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील श्री सप्तश्रृंगी धोकादायक इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने जिल्हा आपत्ती निवारण निधीतून मदत करण्यात यावी. या दुर्घटनेतील जखमींवर आवश्यक ते तातडीने उपचार करण्यात यावेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना तत्परतेने बाहेर काढून त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत. तसेच, या इमारतीमधील इतर रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा, पालिका प्रशासनाला दिले.
कल्याणमधील इमारत दुर्घटनेचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून घेतला. घडल्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. पावसाचा अंदाज घेऊन बचाव कार्य लवकर उरकावे म्हणून पोलीस आणि अग्निशमन विभागाची कुमक वाढविण्यात यावी. आवश्यक वाटले तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात यावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना लवकर शासकीय मदत दिली जाईल, असेही त्यांनी सूचित केले.