डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील छेडा रस्त्यावर जानकी सोसायटीच्या समोर पदपथावरील एक नारळाचे झाड धोकादायक स्थितीत उभे आहे. पश्चिमेत घनश्याम गुप्ते रस्त्यावर एक उंबराचे (औदुंबर) झाड धोकादायक स्थितीत झाल्याने प्रवासी या भागातून जीव मुठीत घेऊन जात आहेत. बुधवारी सकाळी एक महिला या नारळाच्या झाडाखालून जात असताना अचानक नारळाच्या झाडाची झावळी कोसळली. ही महिला थोडक्यात बचावली.
छेडा रस्ता हा वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे सीमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी रस्ते कामासाठी खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्या लगतच्या नारळाच्या मुळांना धोका पोहचला असण्याचा संशय या भागातील रहिवाशांना आहे. पदपथावर उभे असलेल्या या झाडाच्या आजुबाजुने मातीचा भक्कम आधार नाही. चारही बाजुने पदपथाच्या फरशा आणि उघडी पडलेली मुळे असे चित्र या नारळा भोवती आहे.
मुंबईत दोन वर्षापूर्वी रस्त्याच्याकडेचे एक नारळाचे झाड एका पादचाऱ्याच्या अंगावर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अशी काही दुर्घटना घडण्यापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील अशा धोकादायक वृक्षांची पाहणी करून त्यांच्या विषयीचा योग्य निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
छेडा रस्ता परिसरात शाळा आहेत. विद्यार्थी, पालकांची या भागातून सतत वर्दळ असते. फडके रस्ता भागात जाण्यासाठी नागरिक याच रस्त्याने जातात. या नारळाच्या झाडावरचे नारळ रात्री अपरात्री, काही वेळा दिवसा रस्त्यावर पडत असतात. सुदैवाने कोणा पादचाऱ्याच्या डोक्यात नारळ पडलेला नाही, असे स्थानिकांनी सांगितले.
उंबराचे झाड धोकादायक
डोंबिवली पश्चिमेत घनश्याम गुप्ते रस्त्यावर रेल्वे स्थानकाकडून कुळकर्णी ब्रदर्स, गोमांतक बेकरी दुकानाकडून जात असताना पहिल्याच चौकात उंबराचे एक जुनाट झाड आहे. या झाडाच्या फांद्यांचा विस्तार रस्त्याच्या दिशेने पसरला आहे. गुप्ते रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. नागरिक, रिक्षा चालक, इतर वाहनांची या रस्त्यावर वर्दळ असते. या झाडाची एखादी फांदी किंवा पदपथावर धोकादायक स्थितीत असलेले हे झाड कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता या भागातील व्यापारी, रहिवासी व्यक्त करत आहेत.
काही दुर्घटना घडण्यापूर्वीच पालिकेने नारळ, उंबराच्या झाडाबाबत निर्णय घेण्याची मागणी रहिवासी करत आहेत. डोंबिवली शहरात दोन वर्षात अधिक प्रमाणात रस्ते कामे करण्यात आली. यावेळी झालेले रस्ते खोदकाम, झाडांच्या बुडाच्या मातीचा आधार गेल्याने शहरातील अनेक जुनाट झाडे धोकादायक स्थितीत झाली आहेत, असे एका जाणकाराने सांगितले.