कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये दोन वेगळ्या घटनांमध्ये पोलीस उपायुक्तांंच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन दिवसापूर्वी सहा किलो वजनाचे साडे तीन लाखाहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. यामध्ये गांजा आणि मेफोड्रेन पावडरचा समावेश आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोन रिक्षा चालकांना अटक केली आहे. तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन्ही रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

अब्दुल रहमान कुर्बान अली शेख (२४) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो रिक्षा चालक आहे. तो कल्याण पश्चिमेतील रामबाग भागात राहतो. विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक ठाकुर्ली ९० फुटी रस्ता कचोरे भागात मंगळवारी गस्त घालत होते. त्यांना अब्दुल शेख हा आपल्या रिक्षेत काही संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळले. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या रिक्षेची झडती घेतली. रिक्षेमध्ये ४४ हजार रूपये किमतीची मेफोड्रेन पावडर आढळून आली.

या अंमली पदार्थाचे सेवन केल्याने मेंदुवर विपरित परिणाम होतो. हा प्रतिबंधित पदार्थ अब्दुल जवळ बाळगून त्याची तस्करी करत असल्याचे पोलिसांना आढळले. हा पदार्थ कोठून आणला आहे. तो कोणाला विक्री करणार होता, याची माहिती अब्दुल पोलिसांना देऊ शकला नाही. पोलिसांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली.

दुसऱ्या एका घटनेत, बुधवारी विशेष पोलिसांचे कारवाई पथक कल्याण पश्चिमेत चिकणघर हद्दीत होली क्राॅस शाळेच्या पाठीमागील मैदान परिसरात गस्त घालत होते. या भागात एका झाडाच्या आडोशाला एक रिक्षा चालक रिक्षेत काही संशयास्पद हालचाली करत आहे असे गस्तीवरील पोलिसांना आढळले. त्यांनी रिक्षेजवळ जावून चालकाला हटकले असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांचा संशय वाढल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. रिक्षा चालक फैजल अस्लम शेख (३१, रा. भांडुप), साथीदार अफसर सत्तार शेख (३६, रा. नागपूर) या दोघांची पोलिसांनी अंगझडती, रिक्षेची झडती घेतली. त्यांच्याजवळ पोलिसांना सहा किलो गांजा आढळून आला. बाजारात या गांजाची किंमत तीन लाख रूपये आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात या दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण, डोंबिवली शहरांच्या बाहेरून येऊन काही तस्कर काही रिक्षा चालकांना हाताशी धरून कल्याण, डोंबिवली परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. तीन वर्षापूर्वी हेच तस्कर काही शाळकरी गतिमंद मुलांच्या शालेय दप्तराचा वापर अंमली पदार्थ तस्करीसाठी करत होते. हे प्रकार पोलिसांनी संबंधित पालक, शाळांच्या निदर्शनास आणले. त्यानंतर पालक, शाळा आपल्या विशेष मुलांची काळजी घेऊ लागले. या माध्यमातून होणारी तस्करी थांबली आहे.