ठाणे – जिल्ह्यात गेल्या एक वर्षाच्या कालावधीत बालकांसंबंधीत तब्बल २ हजार २७ गुन्ह्याची नोंद झाली असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या एका अहवालातून उघड झाली आहे. यामध्ये १ हजार ४२६ अशी सर्वाधिक प्रकरणे ही बालकांच्या अपहरणाची असून त्याखालोखाल ३६० प्रकरणे ही बालकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची आहेत. यामुळे जिल्ह्यातील बालकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यानिमित्ताने बालकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा महिला बालविकास विभागाकडून कोणत्या उपायोजना राबविल्यात जात आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्या बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून आला. यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य बाल संरक्षण आयोगाने आणि स्थानिक जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध उपायोजना राबविण्यात आल्या होत्या. शाळांमध्ये सीसीटीव्ही, शालेय स्तरावर पालकांची समिती तसेच वेळोवेळी सर्वेक्षण यांसारख्या अनेक उपायोजना राबविण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. असे असतानाच जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून मात्र जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये बालकांसंबंधी दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे प्रकर्षाने उघड झाले आहे.
करोनाकाळातही मोठ्या प्रमाणात लहान बालके चुकीच्या संगतीमुळे गुन्हेगारीकडे वळली होती. यामुळे कोवळ्या वयात गुन्हेगारीकडे वळणे किंवा स्वतः एखाद्या गंभीर गुन्ह्याची शिकार होणे असे चित्र ठाणे जिल्ह्यातील बालकांच्याबाबतीत दिसून येत आहे.
गेल्या एक वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये बालकांसंबंधी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे बालकांच्या अपहरणाचे असून याची संख्या १४२६ इतकी आहे. तर ३६० प्रकरणे ही लैंगिक अत्याचाराची आहेत. तसेच उर्वरीत प्रकरणे ही लहान मुलांना सोडून देणे, त्यांना मारहाण करणे यांसारखी आहेत.
शहर निहाय नोंदविलेले गुन्हे
ठाणे – ८०५
भिवंडी – ३३७
शहापूर – ६३
कल्याण – ३४२
उल्हासनगर – १३७
अंबरनाथ – २३२
मुरबाड – १११