ठाणे : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होऊ लागली असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून शहराचे तापमान चाळीशी पार गेले आहे. बुधवारी शहरातील तापमान ४३.३ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले आहे. वाढत्या तापमानामुळे एप्रिल महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागले असून या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.

हेही वाचा… ठाणे: बा‌ळकुम रस्त्यावर राडारोड्याच्या ढिग वाढू लागले, वाहन धडकून अपघात होण्याची भीती

हेही वाचा… …आणि भाजपवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे ते फलक काढण्याची वेळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यासह ठाणे जिल्ह्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून बदल झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. यानंतर रात्री थंडी आणि दिवसा उष्म असे वातावरण बदल दिसून आले. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होऊन शहराचे तापमान चाळीशी पार गेले आहे. शहरात १० एप्रिलला ४२.१ अंश सेल्सियस तर ११ एप्रिलला ४२.८ अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर, बुधवारी म्हणजेच १२ एप्रिलला तापमानात आणखी वाढ झाली असून शहरात ४३.३ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदविले गेले आहे. ‌‌वाढत्या तापमानामुळे शहरात सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात. दुपारी ३ वाजेपर्यंत हे वातावरण कायम असते. या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. यापासून बचाव करण्यासाठी नागरिक छत्री, स्कार्फ, टोपी, गाॅगलचा वापर करताना दिसत आहेत. तसेच ताक, उसाचा रस, लिंबू सरबत असे पेय पित असून यामुळे थंडपेयाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.