ठाणे – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांवर होणारी प्रवेश प्रक्रिया ठाणे जिल्ह्यातील ६२७ शाळांमधील ११ हजार ३२२ जागांवर राबविण्यात आली. या जागांसाठी प्राप्त झालेल्या २५ हजार अर्जांपैकी चार टप्प्यात १४ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. परंतू, निवड झालेल्या १४ हजार ४१२ विद्यार्थ्यांपैकी केवळ ८ हजार ४९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी १४ मे ही अंतिम मुदत वाढ देण्यात आली होती. त्यामुळे यंदा आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला पालकांनी पाठ फिरवली का असेच चित्र दिसत आहे.
वंचित, दुर्बल घटकातील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. २०२५-२६ य़ा शैक्षणिक वर्षासाठी मागील चार महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. ठाणे जिल्ह्यात ६२७ शाळेतून ११ हजार ३२२ जागांवर आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेला १४ जानेवारी पासून सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातून २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. यातून, सुरुवातीला १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ ६ हजार ७०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते.
त्यानंतर, उर्वरित जागांसाठी टप्प्याटप्प्याने तीन प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आल्या होत्या परंतू, प्रतिक्षा यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी देखील प्रवेश प्रक्रियेला समाधानकारक असा प्रतिसाद दर्शवला नाही. प्रतिक्षा यादी एक, दोन आणि तीन मधून एकूण ३ हजार ९८३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १ हजार ७९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रतिक्षा यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देखील एक ते दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. परंतू, या यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील प्रवेशासाठी इतका उत्साह दिसून आला नाही.
निवड झालेल्या आणि प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
यादी – निवडलेले विद्यार्थी – प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी
नियमित यादी – १०,४२९ – ६,७०५
पहिली प्रतिक्षा यादी – २७०५ – १,१८५
दुसरी प्रतिक्षा यादी – ९५५ – ४६४
तिसरी प्रतिक्षा यादी- ३२३ – १४२
एकूण – १४,४१२ – ८,४९६
या वर्षाची आरटीई प्रवेश प्रकिया ही वेळेत पूर्ण झाली आहे. यंदा बऱ्याच जागा रिक्त राहिल्या आहेत. पालक प्रवेश घेण्यासाठी उत्सुक दिसले नाही . त्याचे कारण म्हणजे पालकांना अर्ज भरताना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. अर्ज भरताना पालक सीबीएसई/ स्टेट /इंटरनॅशनल असे सर्व प्रकारचे बोर्ड सिलेक्ट करतात आणि जर स्टेट बोर्डला नंबर लागला तर, पालक प्रवेश घेण्यासाठी उत्सुक दिसत नाही. त्यामुळे पालकांनी अर्ज भरताना आपल्या पाल्याचा कोणत्या बोर्ड मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्या बोर्डच्या दोन-तीन शाळा समाविष्ट केल्या पाहिजे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.प्रकाश दिलपाक, शिक्षण आरोग्य अधिकार मंच