ठाणे : मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या झारखंडचे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाण्यात जोरदार टीका केली आहे. दुबे यांनी “मराठी लोगो को हम पटक पटक के मारेंगे” असे विधान केल्यावर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.

याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर येथील सभेत “दुबे मुंबई आ जाओ, आपको समुंदर में दुबे दुबे के मारेंगे” असे प्रत्युत्तर दिले होते. या वक्तव्याच्या अनुषंगाने ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर तसेच मनसे पदाधिकाऱ्यांकडून एक व्यंगचित्र फलक लावण्यात आला. या फलकात दुबे यांना समुद्रात डुबवतानाचा प्रसंग चित्रित करण्यात आला असून, त्यांच्या विधानाचा उपरोधिकपणे समाचार घेण्यात आला आहे.

फलकावर “हिंदी सक्तीचा माज असाच ठेचला जाईल असे लिहिण्यात आले असून, यातून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्याच्या धोरणाचा विरोध करण्यात आला आहे. निशिकांत दुबे हे झारखंडचे खासदार असून झारखंडचे एकूण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील योगदान फारच अल्प आहे, तर महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे आर्थिक योगदान देणारे राज्य आहे. अशा राज्यातील भाषेला दुजाभाव दाखवणे व त्यावर वादग्रस्त वक्तव्य करणे हे केवळ दुर्भावनेतून व नैराश्यातून घडल्याचे स्पष्ट होत आहे. दुबे यांना महाराष्ट्रात भाषिक वाद पेटवायचा प्रयत्न करत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीही अनेक वेळा सर्वांनी मराठी शिकण्याचा व वापरण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी येणे आवश्यक असून, मराठी भाषेचा मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याशिवाय, शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी सक्ती नको, अशी भुमिका देखील त्यांनी स्पष्ट केली होती. या मागणीच्या अनुषंगाने मनसेने सरकारवर दबाव आणत हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घ्यायला भाग पाडले होते. दुबे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाषिक अस्मितेचा मुद्दा समोर आला आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी नितीन कंपनी चौकात हे फलक उभारले असून त्यावर एक व्यंगचित्र दर्शविले आहे. या फलकात दुबे यांना समुद्रात डुबवतानाचा प्रसंग चित्रित करण्यात आला असून, त्यांच्या विधानाचा उपरोधिकपणे समाचार घेण्यात आला आहे.