ठाणे : ठाण्यात अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयावरील फलकावरून शरद पवार यांचे छायाचित्र हटवून त्याजागी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असताना त्यावर आता राष्ट्रवादी (अजीत पवार गट)चे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी शरद पवार हे कालही आणि आजही श्रद्धेय असल्याचे सांगत त्यांचे फलकावरील छायाचित्र काढण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसारच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निर्णयानुसार आम्ही शरद पवार यांच्याऐवजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र पक्ष कार्यालयावरील फलकावर लावले आहे, असे परांजपे यांनी म्हटले आहे. “आमच्यासाठी शरद पवार हे कालही श्रद्धेय होते आणि आजही श्रद्धेय आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आणि बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी २ जुलै २३ रोजी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली. तेव्हा ठाण्यातील मी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, आणि तमाम कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला”, असे परांजपे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : केडीएमटीमध्ये सेवानिवृत्तांची थेट मुलाखतीची भरती प्रक्रिया तडकाफडकी रद्द

९ ऑगस्टला ठाणे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन स्वतः अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आम्ही आमच्या कार्यालयाच्या फलकावर शरद पवार यांचेच छायाचित्र लावले होते. पण शरद पवार यांनी वारंवार आवाहन केले होते की, माझ्यापेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेणाऱ्यांनी माझे छायाचित्र कोठेही लावू नये. त्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करुन राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयाच्या फलकावरुन, अत्यंत वेदनेने त्यांचे छायाचित्र आम्ही बदलले आणि त्याठिकाणी त्यांचे गुरु, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राच्या विकासाचा पायाभरणी करणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावले, असे परांजपे यांनी म्हटले आहे.

आमच्या पक्षाच्या अधिकृत भूमिकेनंतर आता आम्ही, फेसबुक, वेबसाईट, ट्विटर किंवा फलक अशा कोणत्याच ठिकाणी शरद पवार यांचे छायाचित्र वापरत नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचेच छायाचित्र आम्ही सर्वत्र वापरत असतो. शरद पवार यांच्या सूचनेचा आदर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निर्णयानुसार, आम्ही शरद पवार यांचे छायाचित्राचा कुठेही उपयोग करत नाही, अशी भूमिका परांजपे यांनी मांडली आहे.

हेही वाचा : कल्याणमधील ज्येष्ठ गायक गिरीश जोशी यांच्या दुचाकीची चोरी

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांचे छायाचित्र वापरण्यावरून वाद रंगलेला असतानाच, ठाण्यात अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयावरील फलकावरून शरद पवार यांचे छायाचित्र हटवून त्याजागी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्यादिवशीच म्हणजेच बुधवारी अचानकपणे बदल झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही महिन्यांपुर्वी फुट पडली. सत्तेत सामील होत अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले तर, त्यांचे सहकाही मंत्री झाले. यानंतर राज्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. दोन्ही गटाने पक्षावर दावा केला असून हा वाद केंद्रीय निवडणुक आयोगापर्यंत पोहचला आहे. त्यावर आयोगात सुनावणी सुरू आहे. शरद पवार हे आमचे दैवतच असे अजित पवार गटाकडून सातत्याने सांगण्यात येत असून त्यांच्या गटाकडून शरद पवार यांचे छायाचित्र फलकावर लावले जात होते. त्यास शरद पवार यांनीच आक्षेप घेतला होता. शरद पवार यांनी छायाचित्र वापरू नका, अशा सुचना अजित पवार गटाला केल्या होत्या. तसेच छायाचित्र वापरल्यास न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे छायाचित्र वापरले जात होते.

हेही वाचा : ठाण्यात आता निसर्ग वाचनालयांची उभारणी, ठाणे महापालिकेचा उपक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाचप्रकारे ठाणे शहरात अजीत पवार गटाचे जिल्हा कार्यालय आहे. जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे दोन्ही नेते या कार्यालयातून जिल्ह्यातील पक्षाचे कामकाज करतात. या पक्ष कार्यालयावर एक फलक लावण्यात आला होता. त्यामध्ये शरद पवार यांचे मोठे छायाचित्र होते. हे छायाचित्र बुधवारी अचानकपणे हटविण्यात आले आहे. त्या जागी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. शरद पवार यांचा १२ डिसेंबर म्हणजेच मंगळवारी वाढदिवस होता. या दिवशी त्यांचे छायाचित्र कार्यालयाच्या फलकावर होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी हे छायाचित्र हटविण्यात आले आहे. अचानकपणे झालेल्या बदलामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी (अजीत पवार गट)चे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.