उल्हासनगरः उल्हासनगर शहराच्या वेशीवर असलेल्या रेजंसी एंटिलीया या भव्य गृहसंकुलाला लागून असलेल्या एका कारखान्याला शनिवारी भीषण आग लागली. येथे फायबरपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंचे मॉडेल बनवले जात असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या जवानांकडून ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता.
उल्हासनगर शहराच्या वेशीवर कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर अनेक मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. उल्हासनगर शहरात जागेचा प्रश्न मोठा असल्याने शहराच्या वेशीवर असलेल्या जागांवर आता मोठ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. याचपैकी रेजंसी एंटिलीया ही मोठी वसाहत आहे. या गृहसंकुलांच्या परिसरात एका कारखान्याला शनिवारी सकाळच्या सुमारास मोठी आग लागली. या कारखान्यात फायबरपासून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंचे मॉडेल बनवले जात होते अशी प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे.
शनिवारी सकाळी या ठिकाणी आग लागल्यानंतर धुराचे मोठे लोट आकाशात दिसत होते. वरप, कांबा या गावांपर्यंत या धुराचे लोट पहायला मिळाले. मात्र फायबरचे कापण्यात आलेले तुकडे आणि कचरा असल्याने धुराचे प्रमाण अधिक होत अशी माहिती अग्नीशमन दलाच्या वतीने देण्यात आली आहे. ही आग कशामुळे लागले याचे कारण समजू शकले नाही. गेल्या १५ दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू असताना अचानक ही आग कशी लागली यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यात कारखाना मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे बोलले जाते.