अंबरनाथ : कल्याणपल्याड अंबरनाथ, बदलापूरच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला अखेर गती मिळणार आहे. यासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी आता राज्य सरकारने आपला वाटा दिला असून ८९ कोटी रुपये भूसंपादन अधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे. तिसरी चौथी रेल्वे मार्गिका अंबरनाथ, बदलापूर यासारख्या शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगर क्षेत्रात अंबरनाथ, बदलापूर या शहरांचे झपाट्याने नागरिकरण होते आहे. त्यामुळे दरवर्षी या शहरांची लोकसंख्या वेगाने वाढते आहे. चाकरमान्यांची शहरे म्हणून या शहरांकडे पाहिले जाते. दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी बदलापूर ते मुंबई हा प्रवास करतात. त्यामुळे गर्दीने खचून भरलेल्या लोकल आणि त्यामुळे होणारे अपघात नवे नाहीत. सध्याच्या घडीला मुंबई ते ठाणे आणि कल्याणपर्यंत सहा रेल्वे मार्गिका उपलब्ध असल्या तरी कल्याणपल्याड कर्जतच्या दिशेने दोनच मार्गिका उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेकदा कल्याण स्थानकातून मेल-एक्सप्रेसचा लोकलसेवेला फटका बसतो. तसेच वाढलेल्या प्रवाशांच्या संख्येला अधिकच्या फेऱ्या आवश्यक असतानाही त्या वाढवता येत नाहीत. त्यामुळे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ अ हाती घेण्यात आला. यात कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका प्रस्तावित करण्यात आली. रेल्वेच्या सर्वेक्षणानंतर यातील ६ हेक्टर जागेची गरज समोर आली. यात बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील बेलवली, कात्रप, कुळगाव तर अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील खुंटवली, मोरिवली आणि चिखलोली या भागातील खासगी, सरकारी मालकीच्या जागा भुसंपादित केल्या जाणार होत्या. त्यासाठी अधिसूचना निघाली, मात्र जमीन मालकांना भूसंपादन मोबदला देण्यासाठी निधीची उपलब्धता होत नव्हती. राज्य आणि केंद्राच्या निम्या भागिदारीतून हा प्रकल्प उभारला जात असून, त्यासाठी राज्याने आपला वाटा दिला नव्हता. त्यामुळे प्रकल्प रखडला होता. अखेर ३१ मार्च रोजी राज्य सरकारने आपला ८९ कोटींचा वाटा भूसंपादन अधिकारी असलेल्या उपविभागीय कार्यालयाला वर्ग केला आहे. त्यामुळे कल्याण ते बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा – Video: “जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल; ठाणे राडा प्रकरणावरून टीकास्र!

प्रकल्प महत्तवाचा कसा?

तिसऱ्या चौथ्या रेल्वे मार्गिकेमुळे कल्याण ते बदलापूर लोकल गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवता येणार आहेत. सध्या मार्गिका नसल्याने कल्याण आणि विठ्ठलवाडी स्थानकात लोकलगाड्या रखडतात. परिणामी चाकरमांन्याना प्रवासात उशीर होतो. तसेच प्रवाशांत संतापही वाढतो. मार्गिकांमुळे नव्या लोकल गाड्या वाढवता येतील. गर्दी विभाजनासाठी हे फायदेशीर ठरेल.

हेही वाचा – “रोशनी शिंदे गर्भवती नाहीत हे कळलं, पण पोटात लाथा मारण्याचं…” उद्धव ठाकरेंचा संतप्त प्रश्न

तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या भूसंपादनासाठी राज्याचा सुमारे १३४ कोटींचा वाटा अपेक्षित होता. त्यातील ८९ कोटी सरकारने ३१ मार्चला वर्ग केले आहेत. उर्वरित निधीही लवकरच दिला जाणार असल्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला गती येणार आहे, असे उल्हासनगर, उपविभागिय अधिकारी जयराज कारभारी म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan badlapur 3rd 4th railway line work finally gain momentum ssb
First published on: 04-04-2023 at 16:39 IST