अंबरनाथः अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्यमार्गावरून प्रवास आता त्रासदायक ठरू लागला आहे. या मार्गावर रविवारी फॉरेस्ट नाका परिसरात मोठी कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालकांना तब्बल तीन तास कोंडीत काढावे लागले. रविवारी फेरफटका मारण्यासाठी, खरेदीसाठी बाहेर पडलेले अनेक नागरिक या कोंडीत अडकून पडले. अंबरनाथ आणि बदलापूर प्रवासासाठी फॉरेस्ट नाका परिसरात दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांचा रांगा लागल्या होत्या.

पूर्वी मोठ्या शहरांमध्ये होणारी कोंडी आता अंबरनाथ, बदलापूर या निम्न शहरांमध्येही होऊ लागली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात ठिकाठिकाणी कोंडीची केंद्रे तयार झाली आहेत. काही ठिकाणी खराब रस्ते, काही ठिकाणी सिग्नल यंत्रणांसाठी अपुरी जागा, चौकांमध्ये वाढलेले अतिक्रमण, ऐन चौकात वाहनांचा वेग घटवणारे खड्डे, रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी वाहने यामुळे वाहनचालकांना फटका बसतो. त्यामुळे अनेकदा कोंडी होत असते.

त्यात कल्याण बदलापूर राज्यमार्गावरील फ़ॉरेस्ट नाका हा चौक सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातो. या चौकात सर्वसाधारण वाहनांसह औद्योगिक वाहनेही मोठ्या प्रमाणावर असतात. शेजारी असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे अनेकदा कोंडी दिसते. रविवारी अशीच अभूतपूर्व कोंडी या मार्गावर पहायला मिळाली. रात्री नऊच्या सुमारास फॉरेस्ट नाका चौकात कोणत्याही कारणाशिवाय मोठी कोंडी पाहायला मिळाली. त्यामुळे बदलापूरहून अंबरनाथकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहने एकाच जागी दीड ते दोन तास खोळंबून पडल्याने अनेक वाहनचालकांनी अंबरनाथहून बदलापुरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर गाड्या वळवल्या. त्यामुळे ती मार्गिकाही ठप्प झाली. त्याचवेळी फॉरेस्ट नाक्यापासून अंबरनाथकडून येणारी आणि जाणाऱ्या मार्गिकेवरही वाहने अडकली.

फॉरेस्ट नाका ते काटई अंबरनाथ मार्गावरील टी जंक्शन चौकाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालकांना तासनतास अडकून पडावे लागले. त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करत होते. रविवारी खरेदीसाठी, फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेले अंबरनाथ आणि बदलापुरकर या कोंडीमुळे वैतागले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलापुरातही कोंडी

बदलापुरात उड्डाणपुलावर एक वाहन बंद पडल्याने रविवारी कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगा थेट पश्चिमेतील दत्त चौकापर्यंत तर तिकडे जुन्या पालिका इमारतीपर्यंत वाढल्या.तर पूर्वेतही अशाच प्रकारची कोंडी गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळते आहे. रस्त्याच्या कडेला खोदलेले खड्डे, पूर्व मोसमी पावसाने वाहून नेलेली माती, त्यामुळे निखळलेले पेव्हर ब्लॉक यामुळे वाहने संथगतीने चालतात. त्यामुळे कोंडीत भर पडते आहे.प्रतिक्रियाः रविवारी काही बेशिस्त वाहनचालकांमुळे फॉरेस्ट नाका परिसरात कोंडी झाली. बदलापूर उड्डाणपुलावरही वाहन बंद पडल्याने कोंडी झाली. मात्र आम्ही महत्वाचे चौक मोकळे ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पावसाळ्यापूर्वी काम सुरू असलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणांना पत्रव्यवहार केला आहे. – विजय पुराणिक, वाहतूक पोलिस निरिक्षक, अंबरनाथ.